दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात

आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Updated: Aug 30, 2017, 11:01 AM IST
दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात title=

ठाणे : आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मनमाड स्थानकावरुन  सुटणारी  पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले .  मनमाड येथून नाशिकला जाण्यासाठी गाडी नसल्याने दररोज नाशिक येथे कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यानी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत गोदावरी एक्स्प्रेस सोडण्याची मागणी केली.

अखेर जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी नाशिकपर्यंत पुढे सोडण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांना नाशिकपर्यंत जाण्याची सोय झाली. विशेष म्हणजे ही गाडी लासलगाव निफाड येथेही थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. तर उत्त्तरेच्या राज्यात मुंबईकड़े  जाणाऱ्या गाड्या मनमाडवरुन पुण्या मार्गे तर काही गाड्या भुसावळ आणि जळगाव येथून सूरत मार्गे वळविण्यात आल्या आहेत .

मंगला एक्सप्रेस हावड़ा -मुंबई एक्सप्रेस  दौंड मार्गे  वळविण्यात आली तर काही गाड्या सुरतमार्गे  वळविण्यात आल्या आहेत. कुठल्या गाड्या  वळविण्यात आल्या याची माहिती दिली जात नाही. मात्र  गाड्या मनमाड स्थानकावर आल्यानंतर त्यांचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. आसनगांव येथे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर  गाड्या नाशिक मार्गे  सोडण्यात येतील असे सांगितले जात आहे. तसेच संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.