वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत- फडणवीस

काही संघटनांनी वारकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू केलं आहे.

Updated: Jul 22, 2018, 05:27 PM IST
वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत- फडणवीस title=

नागपूर: वारकऱ्यांना वेठीस धरणारे लोक शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा संघटनांना खडे बोल सुनावले. आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना विठुरायाची महापूजा करून न देण्याचा चंग बांधला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. 

मात्र, यावेळी त्यांनी पूजेपासून रोखणाऱ्या संघटनांना खडे बोल सुनावले. काही संघटनांनी वारकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू केलं आहे. मागण्यांसाठी वारकऱ्यांना वेठीस धरणं चुकीचं असून जे वारकऱ्यांना वेठीस धरतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाहीत, असे फडणवीसांनी सांगितले. 

गेल्या तीन वर्षापासून मी आषाढी पूजेला जातो. पण काही संघटनांनी जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मेगा भरती रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पण १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने मी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.