कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 30, 2024, 05:22 PM IST
कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं  title=
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News dispute between husband and wife The wife set fire to house

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: नवरा-बायकोतील भांडणे ही नेहमी होतच असतात. प्रत्येक घरात भांड्याला भांड हे लागतच असते. मात्र कधी कधी पती पत्नीचे वाद हे इतके विकोपाला जातात की काहीतरी भयंकर घडते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. पती-पत्नीच्या वादानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. 

पती आणि पत्नीच्या वादानंतर पत्नीने रागाच्या घरात पतीच संपूर्ण घरच पेटवून दिलं आहे. या आगीत वन बीएचके फ्लॅट आगीच्या कचाट्यात सापडला आहे. घरातील सर्व वस्तुही जळून खाक झाल्या आहेत. तर, इमारतीतील शेजाऱ्यांनाही या वादाचा फटका बसला आहे. अखेर अग्निशमन दलाला बोलवून ही आग विझवण्यात आली. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ,महत्वाचं म्हणजे दोघेही डॉक्टर आहेत. ठाकरे नगर भागात ही घटना घडली आहे

छत्रपती संभाजीनगर येथील एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेसमध्ये ही घटना घडली आहे. डॉ. गोविंद वैजवाडे आणि विनिता वैजवाडे असं या दोघा पती-पत्नीचे नाव आहे. डॉ.गोविंद वैजवाडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2019 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद होत होते. 28 जानेवारी रोजी दोघांमध्ये वाद झाले. 

28 जानेवारी रोजी वाद झाल्यानंतर पत्नी विनिता घर सोडून बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सकाळी ६ वाजता घरी आल्या. कॉम्प्लेक्समधील घरी आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून गोविंद हे घराबाहेरुन खाली आहे. या काळात विनिता यांनी आपल्या घरी जाऊन कपड्यांची बॅग भरली आणि खाली येताना घर पेटवून दिले. 

विनिता या बॅग भरुन खाली आल्यानंतर शेजाऱ्यांनी गोविंद यांना घरात आग लागल्याचे सांगितले. गोविंद यांनी अग्निशमन दलाला माहिती देण्याआधीच घरातील वस्तूंनी पेट घेतला होता. घरातील फ्रीज, एसी, टिव्ही, कपाट, पलंग या वस्तू जळून खाक झाल्या होत्या. तसंच, महत्त्वाचे कागदपत्रेही जळून खाक झाले आहेत. 

शेजाऱ्यांना लक्षात आल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. घरात लागलेली आग हळूहळू इमारतीतील इतर घरात पसरू लागली. मात्र अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेतली आहे. तसंच, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पती-पत्नीच्या किरकोळ वादातून घर मात्र बेचिराख झाले आहे.