कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल

दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.

Updated: Apr 1, 2020, 07:50 AM IST
कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागातील सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले. अन्य दोघांचा शोध सुरू आहे. या सातपैकी सहाजण लग्नाला गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ जण आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यात आता अधिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अमरावतीत पाच जण, एकाची प्रकृती चिंताजनक

तर दुसरीकडे  दिल्लीतून आलेले १४ संशयित पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील  ३२ नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला आहे. बाकीजणही लवकरच दाखल करण्यात येतील ,असं महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे. 

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमात कार्यक्रमात दीड-दोन हजार लोक सहभागी झाले होते असा अंदाज आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले काही लोक इंडोनेशिया आणि मलेशियामधूनही आले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात क्वाललांपूर इथं झालेल्या कार्यक्रमातही भाग घेतला होता अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा गट दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला. यामध्ये महाराष्ट्रातूनही काही जण सहभागी झाल्याची माहिती पुढे येत आहे.