मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'

Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 9, 2024, 12:26 PM IST
मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...' title=
जाहीर सभेत आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

Abhishek Ghosalkar Latest News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या हत्येच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच मृत्यूच्या काही तास आधी घोसाळकर आदित्य ठाकरेंना भेटल्याचा खुलासा खुद्द आदित्य ठाकरेंनीच केला.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे?

आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावरुन टीका करताना, "राज्यात गुंडांचे सरकार असून कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. काय चालले आहे, हेच कळत नाही," अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरेंनी पुढे बोलताना मागील काही दिवसांमध्ये झालेल्या घटनांचाही उल्लेख केला. "जळगावमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यावर गोळीबार झाला. उल्हासनगरमध्ये आमदाराने खुलेआम पोलीस ठाण्यात गोळीबार केला आहे. आता मुंबईत गोळीबार झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

कायद्याचा धाक उरलाय का?

आदित्य ठाकरेंनी आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुनही या प्रकरणार भाष्य केलं आहे. "महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे," असं आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

"आता 5 वाजता मातोश्रीवर..."

मात्र घोसाळकर यांच्यावर उपचार सुरु असताना कल्याण पूर्वेतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखेला आदित्य ठाकरेंनी भेट दिली होती. या भेटीच्या वेळेस नुकतीच घोसाळकरांवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीचा संदर्भ आदित्य ठाकरेंनी भाषणात देताना काही तासांपूर्वीच आपण अभिषेक घोसाळकरांना भेटल्याचंही म्हटलं. "कोणी न्यायासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. कायद्याला घाबरले नाहीत, न्यायाला घाबरले नाहीत. पोलिसांना घाबरले नाहीत. तर त्यांच्या दारी असे चिधींचोर पाठवावे लागतात. महाराष्ट्रात किती तरी घटना झाल्यात दीड वर्षात. मोजून दाखवू शकतो. आता आमचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर फायरिंग झाल्याची बातमी आहे. आता 5 वाजता मातोश्रीवर माझ्याशी बैठक करुन गेला," असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> 'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

वाहिली श्रद्धांजली

आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरुन अभिषेक घोसाळकरांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. "अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची बदनामी

या भाषणामध्येही आदित्य ठाकरेंनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. "राज्यात दिवसाढवळ्या गोळीबार, अत्याचार, असह्यतेमुळे आमदाराकडून पोलीस ठाण्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मंत्रालयात गुंड रिल्स तयार करत आहेत. या सगळ्या प्रकाराने महाराष्ट्राची बदनामी होत आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.