...तर विमानतळावर 300 प्रवाशी जागीच झाले असते ठार; अनर्थ थोडक्यात टळला!

Vistara Airlines : दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला आहे. जर हा अपघात झाला असता तर तब्बल 300 प्रवाशांचा जीव गेला असता. मात्र एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले आणि अपघात टळला.

आकाश नेटके | Updated: Aug 23, 2023, 04:15 PM IST
...तर विमानतळावर 300 प्रवाशी जागीच झाले असते ठार; अनर्थ थोडक्यात टळला! title=
(फोटो सौजन्य - PTI)

Delhi Airport : बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळल्याचे समोर आलं आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या (Vistara Airlines) एका विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आल्यानंतर त्याचवेळी दुसरे विमान त्याच ट्रॅकवर उतरण्याच्या तयारीत होते. एटीसीच्या (ATC) तात्काळ सूचनेनंतर तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले. जर या सूचना मिळाल्या नसत्या तर मोठा अपघात झाला असता. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, ही मोठी चूक असल्याचे म्हटलं जात आहे.

पश्चिम बंगालमधील बागदोरा येथे जाणार्‍या फ्लाइट क्रमांक UK725 ला बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या धावपट्टीवरून उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी अहमदाबादहून दिल्लीला विस्तारा विमान उतरणार होते. विमान टेक ऑफ करणार असतानाच अचानक एटीसीला फ्लाइट थांबवण्याच्या सूचना मिळाल्या. सूचना मिळताच विमान थांबले आणि काही मिनिटांतच अहमदाबादहून आलेले विमान धावपट्टीवर उतरले.

एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली ते बागडोगरा हे फ्लाइट UK725 नुकत्याच उद्घाटन झालेल्या नवीन धावपट्टीवरून उड्डाण करणार होते. त्याचवेळी अहमदाबादहून दिल्लीला जाणारे विस्तारा हे विमान लगतच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याच धावपट्टीच्या शेवटच्या दिशेने जात होते.

दोन्ही विमानांना एकाच वेळी उड्डाणाची आणि धावपट्टीवर उतरण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र ही गडबड लक्षात येताच एटीसीने ताबडतोब नियंत्रण मिळवले. कर्तव्यावर असलेल्या एटीसी अधिकाऱ्याने विस्तारा फ्लाइटला उड्डाण रद्द करण्यास सांगितले. उड्डाण रद्द झाल्यानंतर दिल्ली-बागडोगरा विमान ताबडतोब पार्किंग क्षेत्रात परतले.  विमानात इंधन भरले होते जेणेकरून वैमानिकाला बागडोगरा येथे खराब हवामानाचा सामना करावा लागल्यास विमानात दिल्लीला परत येण्यासाठी पुरेसे इंधन असावे. 

विमानाचे उड्डाण योग्य वेळी थांबवले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. मानक कार्यप्रणालीनुसार, टेक-ऑफ आणि लँडिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही विमान किंवा वाहनांच्या हालचालींना परवानगी नसते.

दरम्यान, दोन्ही विमानात एकूण 300 प्रवासी होते. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. दोन्ही विमाने 1.8 किमी किंवा 1,800 मीटर अंतरावर होती. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) इतर विमानांच्या उपस्थितीबद्दल सूचना दिली नसती, तर त्याचा परिणाम भयंकर होऊ शकला असता.