खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक, संजय राऊत यांनी केला विरोध

 खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे.  

Updated: Sep 17, 2020, 12:51 PM IST
खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक, संजय राऊत यांनी केला विरोध  title=

नवी दिल्ली : खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत याबाबत प्रश्न विचारुन मोदी सरकारला धारेवर धरत याप्रश्नी आवाज उठवला. जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटले आहे. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. 

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, आता परिस्थिती अशी आहे की आमचा जीडीपी आणि आमची आरबीआयही दिवाळखोर झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि इतर बर्‍याच ठिकाणी विक्रीसाठी मोठी विक्री आणली आहे. यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश आहे, असे संजय राऊत म्हणालेत.

लॉकडाऊनने काय साधले?

दरम्यान, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला. मात्र, त्याने काय साध्य झाले, उलट कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आणि देश आर्थिक संकटात सापडला आहे, असे सांगत विरोधकांनी मोदी सरकारच्या धोरणावर काल राज्यसभेत हल्लाबोल चढवला.

कोरोनावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. इतर देशांच्या तुलनेत केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती खूप चांगली हाताळल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र, वस्तूस्थिती तशी आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पाकिस्तान, श्रीलंका आणि अन्य देशांतही कोरोनाची स्थिती आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे. लॉकडाऊनमध्ये किती लोक स्थलांतरित झालेत आणि स्थलांतरितांचा मृत्यू झाला याची साधी आकडेवारी सरकारकडे नाही. हे आकडे सरकारने का मिळवले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारला लपवालपवी करायची आहे, असा आरोप आनंद शर्मा यांनी केला.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोदी सरकारच्या कामगिरीमुळे १४ ते २९ लाख लोकांना कोरोनापासून वाचविण्यात आले आहेत. तसेच ३७ ते ७८ हजार नागरिकांना वाचविण्यात सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, हे आकडे आले कुठून त्यामागचा तर्क काय, असा टोलाही यावेळी शर्मा यांनी लगवाला. लॉकडाऊनचा किती फायदा झाला किंवा किती नुकसान झाले हे देशाला समजले पाहिजे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.