भारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही!

चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे. 

Updated: Jun 19, 2020, 12:20 PM IST
भारत-चीन संघर्ष : मोदींनी बोलविली सर्वपक्षीय बैठक, या तीन पक्षांना निमंत्रण नाही! title=

नवी दिल्ली : चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी बोलवली आहे. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत तर तीन राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. भारत-चीन सोबत वाढलेल्या संघर्षावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाग घेतील. परंतु बैठकीला आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि टीडीपी यांना आमंत्रित केले नसल्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. 

वास्तविक ५ खासदार असलेल्या पक्षांना चर्चेत बोलविण्यात आले आहे. परंतु या तिन्ही पक्षांचे खासदार संसदेत ५ पेक्षा कमी आहेत. बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला एकूण १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार.

 बैठकीला हे नेते हजर राहणार ?

 कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान, सिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल,टीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे सीएम के चंद्रशेखर राव, बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, माकपचे महासचिव सीताराम येचुरी,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती समाजवादी पार्टीच नेत अखिलेश यादव, झारखण्डचे मुख्यमंत्री  हेमंत सोरेन 

बैठकीची आजची वेळ महत्त्वाची आहे, कारण सत्ताधारी भाजप सरकारवर सर्व राजकीय पक्षांनी, विशेषत: कॉंग्रेसकडून या विषयावर सविस्तर निवेदन देण्यासाठी दबाव आणला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. लडाख सीमावादाबाबत आणि चीनकडून सीमा रेषेचे होणारे उल्लंघन आणि सीमा संघर्षावरील राजकीय सहमती आवश्यक आहे. त्यासाठी या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे..

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी चीन सैन्याकडून झालेल्या हिंसक झडपेत भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह किमान २० भारतीय सैन्य जवान शहीद झाले होते. त्यानंतर अधिक तणाव निर्माण झाला आहे.