मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल

 मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Updated: Jun 19, 2020, 09:57 AM IST
मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल title=

मुंबई : गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीन हा हल्ला स्वाभिमान आणि अखंडतेवर सगळ्यात मोठा हल्ला आहे. २० जवानांच्या शवपेट्या देशात येणे ही काही स्वाभिमान किंवा गौरवाची गोष्ट नाही.आमच्या जवानांचे बलिदा वाया जाऊ देणार नाही, असे आता सांगण्यात आले. मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काळात चीनशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चीनने आमच्या  जवानांचे क्रूर बळी घेतले आहेत. पंडित नेहरुंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी २० जवानांचे बलिदान सार्थकी लागेल, अशी बोचरी टीका भाजवर शिवसेनेने केली आहे.

चीनचे लोक नरभक्षक आहेत का, ते सांगता येत नाही. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या मासळी-मांस बाजारातून झाला. तेथे शोध घेतला तेव्हा असे समजले की, चीन लोकांचे खाणेपिणे म्हणजे नरभक्षकाला लाजवणारेच आहे. ते वटवाघुळ, पाली, झुरळे, साप, कुत्रे, लांडगे आदी पशु-पक्षी चवीने खातात. त्यामुळे क्रौर्य त्यांच्या नसानसात भिनले टाहे. चीनकडून गलवान खोऱ्यात आमच्या सैनिकांना घेरले, अपहरण केले व काटेरी तारांच्या दांडक्यांनी निर्घृणपणे मारले. भारताचे जवान सावध नव्हते आणि अचनाक हल्ला केला. यापूर्वी पाकिस्तान सैनिकांनी काश्मिरात आमच्या जवानांचे शीर नेले होते. तेव्हा एकाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी उडवून आणू असे आपण सगळेच ओरड होतो. सौरभ कालियाचे प्रकरणही विसरता येणार नाही. बांग्लादेशच्या सीमेवरही आमच्या जवानांची अशाच निर्घृण पद्धतीन मारले होते. आता चीन, अशी आठवण शिवसेनेने मुखमत्र 'सामना' अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्रातील सरकारला करुन दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आता घाईघाईने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मोदी यांनी त्याआधी दिल्लीतून असेही निवेदन केले होते की, भारत कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ, पंतप्रधान असेही सांगत आहेत की, भारत आपला स्वाभिमान आणि एक एक इंच जमिनीचे संरक्षण करेल. मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल मोदींना शिवसेनेने विचारला आहे.

चीनला धडा शिकवायला पाहिजे आणि त्यांची कोंडी करायलाच हवी. चीनबरोबरची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागेल. त्यादृष्टीने तयारी करावी लागेल, असा सल्लाही शिवेसनेने केंद्र सरकारला आणि भाजपला दिला आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी वगैरे ठिक आहे. हवाई दलही तैनात केले. रणगाडे नेऊन ठेवले हे सर्व तर जागेवर राहीलच. पण चीनची आर्थिक कोंडी करणे तर काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे,असे शिवसेनेने म्हटले आहे.

चीनकडून आपल्या देशात येणाऱ्या हजारो वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. पण ही स्वदेशी जागृती दाखवायची जनतेने. मात्र, ज्या अनेक चीनच्या कंपन्या भारतात पसरल्या आहेत त्यांचे काय करणार आहात? महाराष्ट्रातून जरी एखादी चीन कंपनी हद्दपार केली गेली तरी तिच्याशी दुसरे एखादे राज्य करार करु शकते. तेव्हा भारतातील चीन कंपन्यांबाबत केंद्र सरकारनेच एक राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. दोन देशांत सहा लाख कोटींचा व्यापार होतो. गुंतवणूक आणि रोजगार दोन्ही बाजुला आहे, पण फायदा जास्त चीनलाच होतो आहे. दोन देशांत चांगले संबंध निर्माण होत असतानाच ते बिघडण्याचे काम अमेरिकमुळे झाले, असे अग्रलेखात म्हटले आहे. 

चीन हा आमचा सगळ्यात महत्वाचा शेजारी आहे, हे विसरता येणार नाही. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेसारखे शेजारी भारताला  जुमानत नाहीत. तेथे भारत - अमेरिकेची मैत्री झाली म्हणून चीनसारखे राष्ट्र मागे हटेल असे होणार नाही. मोदी जगभर फिरलेत. त्यावेळी रशिया आणि इस्त्रायलसारख्या राष्ट्रांनी भारताची बाजू घेतली नाही. तुमचे भांडण तुम्ही मिटवा हाच त्यांचा संदेश आहे. तसेच १९६२च्या ऑक्टोबरमध्ये चीनने एक धक्का देताच आपली नामुष्की झाली. त्या चुकीचे खापर आपण पंडित नेहरुंवर फोडत राहिलो. पण त्या चुकीपासून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा घेतलेला दिस नाही. संरक्षण - पराष्ट्र धोरणातसंदर्भात त्याच मनमानी चुका करुन आपण २० जवान गमावले आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.