ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

Pakistan Defeated India : युनेस्कोच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. पाकिस्तानला 38 मते मिळाली, तर भारताला केवळ 18 मते मिळाली.

आकाश नेटके | Updated: Nov 26, 2023, 12:54 PM IST
ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह title=

Pakistan Defeated India : संयुक्त राष्ट्राच्या मंचावर (UNITED NATIONS) भारत आणि पाकिस्तान नेहमीच यांच्यात वादावादी होत असते. इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर अनेकदा उघडपणे समोर येते. भारत आपल्या उत्कृष्ट मुत्सद्देगिरीच्या बळावर पाकिस्तानला अनेकदा पराभूत करत असतो. काश्मिरच्या मुद्द्यावरुन वारंवार भाष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारत सडेतोड प्रत्युत्तर देत असतो. मात्र यावेळी पाकिस्तानचं पारडं जड ठरलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर एका निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. मात्र या निकालावरुन आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या मंचावर जगातील देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावरुन सातत्याने खोटं बोलत असतो. तर दुसरीकडे भारत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला उघडं पाडण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानचा विजय झाला. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. 

युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला. युनेस्को ही शिक्षण, कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर काम करणारी संयुक्त राष्ट्रांची एक संघटना आहे. ही संस्था जागतिक शांततेसाठीही काम करते. मात्र युनेस्कोच्या यादीत शारदा पीठ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक संस्थेचे उपाध्यक्ष पद दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निकालाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या या निवडणुकीत पाकिस्तानला 38 तर भारताला केवळ 18 मते मिळाली होता. त्यामुळे पाकिस्तानकडे युनेस्कोचे उपाध्यक्षपद असणार आहे. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळात 58 सदस्य आहेत. दुसरीकडे या विजयामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड उत्साह आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून त्यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले आहेत. मात्र, पाकिस्तानच्या या विजयाचा भारतावर शून्य परिणाम होणार आहे. उपाध्यक्षपद मिळालं तरी कोणताही निर्णय घेताना पाकिस्तानला 57 सदस्यांचे मत घ्यावं लागेल. या सदस्यांच्या मताशिवाय पाकिस्तान युनेस्कोच्या यादीत कोणताही वारसा जोडू किंवा कमी करू शकत नाही.

दुसरीकडे, पाकिस्तानने दावा केला आहे की ते संपूर्ण जबाबदारीने आपलं काम पार पाडतील. एकीकडे पाकिस्तान युनेस्कोच्या जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच देशात न्यायालयाच्या कथित आदेशावरून सिंध प्रांतातील हिंदूंचे हिंगलाज माता मंदिर पाडण्यात आले. युनेस्कोच्या यादीत असलेले शारदा पीठ हे हिंदू मंदिर देखील पाडण्यात आले आहे. दरम्यान, याआधीही पाकिस्तानात अनेक मंदिरे पाडण्यात आली असून इस्लामाबादमध्ये हिंदू मंदिरासाठी जागा देऊनही ते बांधू दिले जात नसल्याचे समोर आलं आहे.