देशातील उद्योजकांना सरकारची भीती- राहुल बजाज

अनेक उद्योजक मला सांगतात...

Updated: Dec 1, 2019, 01:10 PM IST
देशातील उद्योजकांना सरकारची भीती-  राहुल बजाज title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बजाज उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी असणआऱ्या राहुल बजाज rahul bajaj  यांनी देशातील दिग्गज मंत्र्यांसमोरच त्यांच्या मनातील एक स्पष्ट बाब व्यक्त केली. मॉब लिंचिंगसारख्या प्रकरणांना हाताळण्यात अपयश, प्रज्ञा ठाकूरच वादग्रस्त वक्तव्य आणि सत्तेत असणाऱ्या सरकारवर टीका करण्याचं कमी होणारं प्रमाण अशा मुद्द्यांवर त्यांनी आपलं म्हणणं पुढे केलं. राहुल बजाज यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह amit shah, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि  रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थिती होती. 

मुंबईत पार पडलेल्या 'द इकोनॉमिक टाईम्स' आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात बजाज यांनी त्यांचं ठाम मत मांडलं. 'कोणी काहीच बोलणार नाही.... काहीच नाही. मी ही बाब स्पष्टपणे सांगेन. एक वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे. यूपीए सत्तेत असताना आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो. तुम्ही (सत्तेत असणारे) अतिशय चांगलं काम करत आहात. पण, तरीही जर तुमच्याविरोधात आम्ही बोललो, टीका केली तर त्याला तुम्ही दाद द्याल याबद्दल आम्हाला आत्मविश्वास नाही', असं बजाज म्हणाले. 

बजाज यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर मंत्रीमहोदयांसोबतच रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि भारती उद्योग समूहाचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल उपस्थित होते. 

मुख्य म्हणजे बजाज यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावण्याचं आणखी एक कारण म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतच केलेलं एक वक्तव्य. National Economy Conclaveमध्ये समाजात असणाऱ्या भीतीच्या वातावरणाविषयी सांगत सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीची चिंता व्यक्त केली होती. सरकारी अधिकारी आणि निर्णयांची भीती असल्याचं अनेक उद्योजक मला सांगतात. नवे प्रकल्प पुढे आणण्यासही ते घाबरत आहे', असं बजाज म्हणाले. 

बजाज यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अमित शाह? 

कोणालाही कोणत्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही, असं म्हणत हे वातावरण दिसल्यास परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे असं, शाह म्हणाले. 

'जर असं वातावरण तयार होत असेल तर, तिच परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. मी हे सांगू इच्छितो की कोणालाही कोणत्याच कारणासाठी घाबरण्याची गरज नाही. इथे कोणालाही कोणीही कशाचीच भीती घालत नाही आहे. किंबहुना असंही वातावरण नाही, की कोणाविरोधात कोण बोलेल त्याची सरकारला चिंता असेल असं काहीच नाही. सरकार सर्वात पारदर्शक मार्गाने चालत आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या विरोधाची भीती नाही आणि कोणी विरोध केलाच तर, त्यांचे मुद्दे लक्षात घेता आम्ही त्या अनुषंगाने सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करु', असं शाह म्हणाले.