सीएम रुपाणींसमोर विजयाचं आव्हान

सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपाणींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवलाय. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी  आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलंय. 

Updated: Dec 6, 2017, 04:48 PM IST
सीएम रुपाणींसमोर विजयाचं आव्हान title=

विनोद पाटील, झी मीडिया, राजकोट : सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपाणींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवलाय. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी  आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलंय. 

राजकोट पश्चिमकडे लक्ष

सा-या गुजरातच्या जनतेचं लक्ष लागलंय ते राजकोट पश्चिम या मतदारसंघाकडे. कारण या मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपाणी हे पुन्हा एकदा नशिब आजमावत आहेत. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रुपाणींची मुख्मंत्रीपदी वर्णी लागली. 

गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार 

2014 मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत  रूपाणी 27 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. मात्र यावेळी ही निवडणूक एवढी सोपी राहिलेली नाही. कारण राजकोट पूर्वचे आमदार आणि गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत आलेल्या इंद्रनील राजगुरू यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलंय. रूपाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजगुरूंनी रूपाणीॆचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून रुपाणींच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. राजगुरू गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यामुळे ते पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. 

भाजपचा बालेकिल्ला...

हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र या निवडणुकीत सारी समीकरणं बदललेली आहेत. या मतदारसंघात पाटीदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी जातीय समीकरणं महत्वाची ठरू शकतात. 

राजकोटमधील जातीचं गणित...

 या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. 75 हजार मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत. तर 35 हजार मतदार क्षत्रिय आहेत. राजगुरू येत असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या 25 हजारांवर आहे. तर 35 हजार वाणी आहेत. रुपाणी येत असलेल्या जैनांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. हार्दिक पटेल फॅक्टर चालला तर पटेलांची नाराजी भाजपला भोवू शकते. मात्र विकासाच्या जोरावर रुपाणींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. 

राजकोटचे हे आहेत प्रश्न...

भाजप विकासाची भाषा करत असलं तरी अजूनही राजकोटमध्ये  24 तास पाणीपुरवठा नाही. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच जोर धरू लागलाय. या मतदारसंघानं आतापर्यंत दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत. 2002 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर रुपाणींना ही संधी मिळाली. मात्र वेळी रूपाणींना पराभूत करण्यासाठी इंद्रनील आणि काँग्रेसनं कंबर कसलीय. तर विजयाचा विश्वास असल्यामुळेच रुपाणी आपला मतदारसंघ सोडून राज्यभर दौरे करत आहेत. मात्र त्याचवेळी त्यांना आपल्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींच्या दोनदा सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळं मोदी-शाहांना रुपाणींच्या विजयावर विश्वास असला तरी मतदार विश्वास दाखवतील का हा प्रश्न आहे.

मतदार संघाची रचना... 

राजकोट पश्चिम मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार 
75 हजार मतदार हे पाटीदार समाजाचे
35 हजार मतदार क्षत्रिय 
राजगुरू ब्राह्मण समाजाचे उमेदवार
ब्राह्मण मतदारांची संख्या 25 हाजारांवर 
35 हजार वाणी आहेत 
मुख्यमंत्री रुपाणी हे जैन धर्माचे 
जैन मतदारांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी