BREAKING : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

Updated: Sep 22, 2021, 06:35 PM IST
BREAKING : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने तशी माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.  केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. आरोग्य व्यवस्था सांभाळणं आणि कोरोनामुळे जीवीतहानी झालेली आहे त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेश दिले आहेत.