अग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन'

भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत.

Surendra Gangan Updated: Jul 1, 2018, 05:49 PM IST
अग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन' title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत जाऊन पोहोचलाय. दरम्यान, जबरदस्त मारा करण्याची ताकद असलेल्या अग्नी-५च्या टप्प्यात चीन आलाय. त्यामुळे चीनच्या महत्वाच्या शहरांवर आपण सहज मारा करु शकतो.

अग्नी-५ या आंतरखडीय प्रक्षेपक क्षेपणास्त्र (इंटरकॉन्टीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल) प्रणालीचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश केला जाणार आहे. यामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि शान आणखी वाढणार आहे. नेहमी खुरापती काढणाऱ्या चीनलाही जबर बसविणे यामुळे शक्य झालेय. कारण अग्नी-५ मुळे भारताच्या टप्प्यात चीन आला आहे. 

अग्नी-५ ची मारक क्षमता तब्बल ५ हजार किमी आहे. अग्नी-५ मध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमतासुद्धा आहे. लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यापूर्वी विविध पातळ्यांवर चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता चीनसुद्धा आपल्या टप्प्यात आला आहे. चीनमधील बिजींग, शांघाई, ग्वांगझोऊ व थायलंडवर सुद्धा अग्नी-५ सहजपणे मारा करु शकते, या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वात आधुनिक प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली अग्नी-५ क्षेपणास्त्र प्रणाली आहे. भारतीय सीमा आव्हानांचा सामना करत असतानाच अग्नी-५ लष्करामध्ये सामील होण्यास सज्ज झाली आहे. 

अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२ मध्ये, त्यानंतर दुसरी चाचणी १५ सप्टेंबर २०१३ ला करण्यात आली. तिसरी चाचणी ३१ जानेवारी २०१५ ला करण्यात आली. चौथी चाचणी २६ डिसेंबर २०१६ तर पाचवी चाचणी यावर्षी १८ जानेवारीला करण्यात आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. 

क्षेपणास्त्रांची मारक क्षमता

- अग्नी-१ - ७०० किमी 
- अग्नी-२ - २००० किमी 
- अग्नी-३ - २५०० किमी 
- अग्नी-४ - २५०० ते ३५०० किमी
- अग्नी-५ - ५००० किमी