सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं? पाहा काय आहे सत्य

सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास वजन खरंच कमी होतं का?

Updated: Apr 21, 2022, 02:02 PM IST
सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं? पाहा काय आहे सत्य title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत विविध पद्धतीचा वापर केला असेल. यातीलच एक पद्धत म्हणजे सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिणं. सकाळी उपाशी पोटी याचं सेवन केल्यास वजन कमी होतं शिवाय बेली फॅट कमी होण्यासंही मदत होते असं म्हटलं जातं. मात्र असं खरंच होत का? याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास त्याचा सरळ फायदा वजन कमी होण्यावर होत नाही. मात्र काही अभ्यासांमधून असं लक्षात आलं आहे की, लिंबू पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशन या जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की, लिंबाच्या रसात असणारे पॉलीफेनोल्स आणि लिंबाची सालं यकृताच्या फॅट बर्न करण्याच्या प्रोसेसला प्रोत्साहित करतात. 
ज्यावेळी उंदरांवर हा अभ्यास करण्यात आला, तेव्हा त्यांना अधिक फॅटयुक्त अन्न खाण्यास दिलं होतं. त्यामुळे माणसांवर याचा परिणाम कसा होतो याबाबत शाश्वती नाही. 

लिंबामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. जे भूक आणि कॅलरीची मात्रा कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. लिंबाच्या रसामध्ये 1 ग्रामपेक्षाही कमी प्रमाणान पेक्टिन हे फायबर असतं. त्यामुळे शरीराला हे फायबर कमी प्रमाणात मिळत असल्याने भूक कमी लागण्याच्या आणि कॅलरीज कमी मिळण्याच्याबाबत अधिक फायदा मिळत नाही. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, साध्या आणि सोप्या शब्दांत लिंबू पाणी हे डिटॉक्स ड्रिंक आहे त्यामुळे याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होत नाही.