गर्भधारणेत येतायत अडचणी? आयुर्वेदात सांगितलेल्या या उपायांमुळे होणार मोठी मदत

 लहानमोठ्या प्रमाणात आपल्याकडून होणाऱ्या याच चुका पुढे मोठा फटका देतात.   

Updated: Feb 22, 2022, 03:10 PM IST
गर्भधारणेत येतायत अडचणी? आयुर्वेदात सांगितलेल्या या उपायांमुळे होणार मोठी मदत title=
छाया सौजन्य- बेबी सेंटर

मुंबई : सध्याच्या पिढीसमोर अनेक अडचणी आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे शारीरिक सुदृढतेची. सकाळी उठल्यानंतर व्यायामाऐवजी नोकरीसाठी धाव मारणं, तिथे एकाच ठिकाणी बसून अनेक तास सलग काम करणं आणि त्यातही बऱ्याचदा बाहेरचं खाणं ही यामागची कारणं. 

कारणांपेक्षा आपल्या शरीरावर परिणाम करणारे हे गंभीर घटक. लहानमोठ्या प्रमाणात आपल्याकडून होणाऱ्या याच चुका पुढे मोठा फटका देतात. 

महिलांमध्ये याचे परिणाम त्यांच्या गर्भधारणा क्षमतेवर होताना दिसतात. आज अशा असंख्य जोड्या दिसतात जे आयवीएफ, दत्तक मुल किंवा सरोगसीच्या वाटा निवडतात.

पण, असं न करता आणि भरमसाट औषधं न घेताही योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास गर्भधारणेसाठी मोठी मदत होते. 

काही तज्ज्ञांच्या मते, वयवर्ष 20ची अखेर आणि 30 व्या वर्षाच्या सुरुवातीची वेळ ही गर्भधारणेसाठी योग्य असते. असं म्हटलं जातं की वाढत्या वयासोबत मूल होण्याची शक्यता कमी होत जाते. 

परिणामी 35 वर्षांच्या आधीच गरोदरपणाबाबत जोडप्यांनी निर्णय घ्यावा. मासिक पाळीपासून दहावा दिवस ते 20 व्या दिवसापर्यंतच्या दिवसांमधील संबंध गर्भधारणेसाठी मदत करतात. 

14 व्या दिवशी शरीरसंबंध ठेवल्यास अधिक लवकर गर्भरणा शक्य होते. गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास पंचकर्म, विरेचन, वमन कर्म यांची मदत मोठी ठरते. 

नात्यात असणाऱ्या दोन व्यक्ती, पती पत्नी हे कायम मानसिक तणावापासून दूर असण्याचाही इथं फायदा होतो. प्राणायाम, ध्यानधारणा आणि योग्य व्यायामही इथं फायद्याचे ठरतात. 

लग्नानंतर बरीच वर्षे उलटली, तरीही बाळ होत नसल्यामुळे नैराश्यात असणाऱ्या अनेक जोड्यांसाठी महत्त्वाची टीप म्हणजे, त्यांनी आहाराच्या सवयीसुद्धा बदलाव्यात. 

फळं आणि भाजीपाला खाण्यावर भर द्यावा. पालक, ब्रोकोली, डाळ, अख्खी धान्य आणि फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थांचं सेवन करावं. 

ओमेगा 3 हे फॅटी अॅसिडचा प्राथमिक आणि तितकाच महत्त्वाचा स्त्रोत असतात. याचाही गर्भधारण क्षमतेमध्ये फायदा मिळतो. 

फक्त महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही त्यांच्या आहाराच्या सवयी बदलाव्या. दूध, तूप, तीळ या गोष्टी त्यांना लाभदायी ठरतात.