T20 World Cup साठी हार्दिक पांड्याचं सिलेक्शन होणार का? रोहित शर्माने ठेवली 'ही' अट

Hardik Pandya In T20 World Cup : एकीकडे आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या ट्रोल होत असताना दुसरीकडे त्याचं प्रदर्शन देखील रोहित शर्मासाठी चितेंचा विषय आहे. त्यामुळे आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 16, 2024, 08:46 PM IST
T20 World Cup साठी हार्दिक पांड्याचं सिलेक्शन होणार का? रोहित शर्माने ठेवली 'ही' अट title=
Hardik Pandya T20 World Cup

Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया 5 जूनपासून आपल्या वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) मोहिमेला सुरूवात करणार आहे. आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पहिला सामना असेल तर 9 जूनला भारत पाकिस्तानसोबत भिडणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने टीम सिलेक्शनसाठी तयारी सुरू केलीये. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं नुकतीच भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली. त्यावेळी पांड्याला (Hardik Pandya) संघात घेण्याबाबत काय चर्चा झाली? याची माहिती समोर आली आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या मुख्यालयात गेल्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर उपस्थित होते. यावेळी हार्दिक पांड्या याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट करावं की नाही? यावर चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याने जर उर्वरित आयपीएल हंगामात गोलंदाजी केली तरच त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवावं, अशी चर्चा झाल्याचं देखील समजतंय. फक्त गोलंदाजी करणं नव्हे तर चांगली गोलंदाजी करणं सिलेक्शन टीमला अपेक्षित आहे.

हार्दिक पांड्याला आत्तापर्यंतच्या 7 सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नाही. तर कॅप्टन म्हणून देखील हार्दिक पांड्या फेल ठरलाय. फलंदाजीत एखादी दुसरी खेळी सोडली तर पांड्याला ऑलराऊंडर म्हणून चमकदार कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे आता पांड्याचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पत्ता कट होणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे. पांड्या संघात नसेल तर त्याच्या जागी कोणाला खेळवणार? शिवम दुबे त्याची जागा घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

दरम्यान, हार्दिक पांड्याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय बनला आहे. तर आश्विनला देखील विकेट्स मिळत नाहीयेत. तर जडेजाला देखील म्हणावी अशी कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे आता ऑलराऊंडर म्हणून कोणाला संधी मिळणार? शार्दुलला संधी दिली जाईल का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.