'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले

झिम्बाब्वेविरोधातील (Ind vs Zimbabwe) चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अंतिम क्षणी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण यावेळी यशस्वी जैस्वालचं (Yashasvi Jaiswal) शतक थोडक्यात हुकलं.  

शिवराज यादव | Updated: Jul 14, 2024, 07:40 PM IST
'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले title=

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे (Ind vs Zimbabwe) दौऱ्यावर असून चौथ्या टी-20 सामन्यात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) या सामन्यात अर्धशतक ठोकलं. मात्र तरीही चाहते त्याच्यावर नाराज आहेत. त्याचं एक कृत्य चाहत्यांना पटलेलं नसून, त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. याचं कारण त्याने यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal ) शतकाच्या जवळ असतानाही शुभमन गिलने त्याला शतक करण्याची संधी दिली नाही. सुरुवातीपासून शांतपणे खेळणाऱ्या शुभमन गिलने अखेरच्या क्षणी मात्र आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. पण यामुळे यशस्वी जैसवालचं शतक 7 धावांनी हुकलं. 

भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी 21 धावांची गरज होती तेव्हा ना गिलने अर्धशतक पूर्ण केलं होतं, ना जैस्वालने शतक पूर्ण केले होते. शुभमन गिल 34 चेंडूत 48, तर यशस्वी 50 चेंडूत 83 धावांवर खेळत होता. यावेळी शुभमन गिल धीमच्या गतीने खेळेल आणि य़शस्वीला तीन अंकी संख्या गाठण्यात मदत करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण गिलने पुढच्या दोन चेंडूंवर 8 धावा ठोकत यशस्वीला शतकापासून दूरच ठेवलं. 

शुभमन गिलने अखेरच्या क्षणी आक्रमक खेळी कऱणं क्रिकेटचाहत्यांना आवडलं नाही. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे. 

यशस्वी जैसवालला अंतिम क्षणी शुभमन गिलसोबत झालेली चर्चा आणि शतक हुकल्याबद्दल सामन्यानंतर विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की, "आम्ही फक्त सामना संपवण्याचा विचार करत होता. संघ एकही विकेट न गमावता जिंकावा यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता".

जैस्वाल म्हणाला, "मनात फक्त एकच गोष्ट होती की एकही विकेट न जाता खेळ संपावा. मला आज खेळताना खूप आनंद झाला, शुभमन भाईसोबत हा एक अप्रतिम अनुभव होता आणि मला धावा करताना खूप आनंद झाला. मी जेव्हाही भारतासाठी खेळतो तेव्हा मला खरोखर आनंद होतो आणि अभिमान वाटतो".