'धोनी-कोहलीशिवाय अर्धे यशस्वीही नसतो'; टीम इंडियाच्या सदस्याची कबुली

'टीम म्हणून आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये जे काही मिळवलं आहे, त्याचं श्रेय कोहली आणि धोनीला जातं

Updated: May 16, 2019, 09:49 PM IST
'धोनी-कोहलीशिवाय अर्धे यशस्वीही नसतो'; टीम इंडियाच्या सदस्याची कबुली title=

मुंबई : 'टीम म्हणून आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये जे काही मिळवलं आहे, त्याचं श्रेय कोहली आणि धोनीला जातं, असं वक्तव्य भारताचा स्पिनर कुलदीप यादवने केलं आहे. कोहली आणि धोनी आम्हाला मैदानात मार्गदर्शन देतात. धोनी विकेटच्या मागे उभं राहून काय काय सांगतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. रोहित आणि कोहली धोनीसोबत रणनिती ठरवतात. या वरिष्ठ खेळाडूंची रणनिती आम्ही लागू करतो,' असं कुलदीप म्हणाला.

'वरिष्ठ खेळाडूंनी आम्हाला मार्ग दाखवला नसता, तर मी आणि चहल याच्या अर्धेही यशस्वी झालो नसतो. तुमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि तुमचं समर्थन करणाऱ्या कर्णधाराची गरज असते. कोहलीने आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं नसतं, तर आम्ही एवढे यशस्वी झालो नसतो,' असं कुलदीपने कबूल केलं.

मागच्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये कुलदीपने इंग्लंडच्या बॅट्समनना त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र कुलदीपची कामगिरी निराशाजनक झाली. कोलकात्याच्या टीमने कुलदीपला सुरुवातीच्या काही मॅचनंतर खेळवलंही नाही. पण टी-२० क्रिकेट आणि वनडे क्रिकेट याच्यात फरक असतो, असं कुलदीप यादवने सांगितलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकात्याच्याच आंद्रे रसेलने वादळी बॅटिंग केली. पण वर्ल्ड कपमध्ये आपल्याकडे रसेलविरुद्धची रणनिती तयार असल्याचं कुलदीप म्हणाला. रसेल स्पिनरविरुद्ध आक्रमक खेळतो, पण जर बॉल स्पिन होत असले, तर त्याला अडचणीचा सामना करावा लागतो, असं कुलदीप म्हणाला. 

कुलदीप यादव हा वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या टीम इंडियाचा सदस्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक झाली. कोलकात्याकडून खेळताना कुलदीपने ९ मॅचमध्ये फक्त ४ विकेट घेतल्या. खराब कामगिरीमुळे कुलदीप यादवला कोलकात्याने उरलेल्या मॅचमधून डच्चू दिला होता.