'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार

IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: इंडियन प्रिमिअर लीगचा 10 वा सामना शुक्रवारी कोलकाता आणि बंगळुरुच्या संघादरम्यान एम. चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 30, 2024, 11:42 AM IST
'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार title=
पॉइण्ट्स टेबलमध्ये कोलकाता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे

IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: मैदानावरील आकडेमोडीमध्ये अडकलेली क्रिकेटमधील शत्रूत्व बाजूला ठेवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यामध्ये शुक्रवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार तसेच आरबीसीचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि कोलकात्याचा मेंटॉर गौतम गंभीर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मागील पर्वात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असताना दोघांमध्ये मैदानात वाद झाला होता. अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल-हकबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर गंभीर आणि विराटमध्ये मैदानातच बाचाबाची झालेली. या दोघांमधील वाद बराच गाजला होता. पण या वादावर आता दोघांनी पडदा टाकला आहे. 

ऑस्कर्सही द्या

शुक्रवारी गौतम गंभीर मैदानामध्ये विराट कोहलीच्या दिशेने चालत आला आणि त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. दोघांनी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर एकमेकांना मिठी मारली. या दोघांच्या या हस्तांदोलनाचा आणि मिठीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समोरचं दृष्य पाहून कॉमेंट्री बॉक्समधून रवी शास्त्रींनी, 'विराट आणि गौतम गंभीरने मारलेल्या मिठीसाठी केकेआरला फेअर प्ले पुरस्कार दिला पाहिजे,' असं म्हटलं. रवी शास्त्रींनी केलेल्या या विधानावर लगेच त्यांच्याबरोबर कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावसकर यांनी, "केवळ फेअर प्ले पुरस्कार नाही तर ऑस्करही दिला पाहिजे," असं म्हटलं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये एकच हशा पिकला.

पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप

विराट कोहली सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वामध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. त्याने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये 83 धावांची खेळी केली. हे कोहलीचे सलग दुसरे अर्धशतक ठरलं. विराटने 59 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकराच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र विराटच्या दमदार खेळीनंतरही बंगळुरुच्या संघाचा 7 विकेट्सने पराभव झाला. विराट नक्कीच केकेआरविरुद्ध शतक झळकावेल असं वाटत होतं. मात्र 20 ओव्हरचा खेळ संपेपर्यंत तो 83 धावांवर नाबाद राहिला. आपल्या तीन सामन्यांपैकी आरसीबीने दोन सामने गमावले आहेत.

नक्की वाचा >> विराटच्या 59 बॉल 83 धावांमुळे RCB हरली म्हणणाऱ्यांना गावसकरांनी झापलं; म्हणाले, 'त्याने 120 धावा..'

घरच्या मैदानावर खेळताना सामना गमावणारी आरसीबी ही यंदाच्या पर्वातील पहिलीच टीम ठरली आहे. दुसरीकडे कोलकात्याने आपले दोन्ही सामने जिंकत पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उडी घेतली आहे. केकेआरचा संघ दोन्ही सामने जिंकून 4 पॉइण्ट्ससहीत दुसऱ्या स्थानी आहे. नेट रन रेटच्या जोरावर केवळ चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकात्याहून वरच्या स्थानी आहे.