आयपीएल २०१९ : बुमराहच्या दुखापतीवर मुंबईची पहिली प्रतिक्रिया

दोनच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आयपीएलदरम्यान मुंबई आणि दिल्लीमधल्या मॅचनंतर भारतीय क्रिकेट रसिकांची चिंता वाढली.

Updated: Mar 25, 2019, 05:04 PM IST
आयपीएल २०१९ : बुमराहच्या दुखापतीवर मुंबईची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आयपीएलदरम्यान मुंबई आणि दिल्लीमधल्या मॅचनंतर भारतीय क्रिकेट रसिकांची चिंता वाढली. दिल्लीविरुद्धच्या मॅचवेळी मुंबईचा बॉलर जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. यामुळे बुमराह शेवटच्या ४ बॉलसाठी बॅटिंगलाही आला नाही. या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला. दिल्लीची इनिंग सुरु असताना शेवटच्या बॉलवर बुमराह खेळपट्टीवर पडला, तेव्हा त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. बुमराहने ऋषभ पंतला शेवटचा बॉल यॉर्कर टाकला. हा बॉल पंतने बुमराहच्या दिशेने मारला. हा बॉल अडवताना बुमराह पडला यानंतर तो खांदा पकडून उभा राहिला.

बुमराहची ही अवस्था बघितल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि इतर खेळाडू बुमराहच्या दिशेने धावले. मुंबई टीमचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल मैदानात आले. डगआऊटमध्ये जाताना बुमराहला त्याचा हात उचलता येत नव्हता. यामुळे चिंता वाढली होती, पण आता मुंबई टीमने बुमराह ठीक असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं आहे.

बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचं मॅचदरम्यानच स्पष्ट झालं होतं. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्याला शेवटच्या ४ बॉलसाठी बॅटिंगला पाठवण्यात आलं नव्हतं. बुमराहच्या दुखापतीवर सोमवारीही लक्ष ठेवलं जाईल.

आयपीएल संपल्यानंतर भारत वर्ल्ड कपसाठी रवाना होणार आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने बुमराहचं फिट राहणं भारतासाठी महत्त्वाचं आहे, कारण तो भारताचा हुकमी एक्का आहे.