रोहित-धोनीनं भारताला जिंकवलं, मालिकाही टाकली खिशात

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्स आणि २९ बॉल्स राखून विजय झाला आहे.

Updated: Aug 27, 2017, 10:44 PM IST
रोहित-धोनीनं भारताला जिंकवलं, मालिकाही टाकली खिशात  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्स आणि २९ बॉल्स राखून विजय झाला आहे. या विजयाबरोबरच ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नाबाद १२४ रन्स आणि धोनीच्या नाबाद ६७ रन्समुळे भारताचा विजय सोपा झाला. रोहित शर्माचं हे १२वं शतक होतं. रोहितच्या या इनिंगमध्ये १६ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.

२१८ रन्सचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्के बसले. १३८ रन्सवर भारताचे ४ बॅट्समन आऊट झाले होते, पण रोहित शर्मा आणि धोनीनं भारताची इनिंग सावरली.

या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी २१८ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेणाऱ्या श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्सच्या मोबदल्यात २१७ रन्स बनवता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या, अक्सर पटेल आणि केदार जाधवला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजयाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या प्रेक्षकांचा रडीचा डाव पाहायला मिळाला. भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना प्रेक्षकांनी बाटल्या फेकून मारायला सुरुवात केली. प्रेक्षकांच्या या गोंधळामुळे थोडावेळ मॅच थांबवण्यात आली होती.