'आम्ही पाकिस्तानात चांगले खेळलो, पण इथे भारतात आम्हाला...,' पराभव दिसताच बांगलादेशचे खेळाडू रडू लागले

India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर वर्चस्व मिळवलं असून, हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान बांगलादेश संघाचा जलदगती गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याने संघाच्या खराब कामगिरीची कारणं सांगितली आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 21, 2024, 02:50 PM IST
'आम्ही पाकिस्तानात चांगले खेळलो, पण इथे भारतात आम्हाला...,' पराभव दिसताच बांगलादेशचे खेळाडू रडू लागले title=

India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर वर्चस्व मिळवलं असून, हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान बांगलादेश संघाचा जलदगती गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याने संघाच्या खराब कामगिरीची कारणं सांगितली आहेत. भारतीय स्थितींमध्ये एसजी चेंडूसह खेळण्याची आम्हाला अद्याप सवय नसल्याचं त्याने म्हटलं आहे. तस्कीन याने पहिल्या डावात तीन विकेट्स मिळवल्या आहेत. 

“आम्ही एकंदरीत पाकिस्तानमध्ये चांगले खेळलो आणि त्यामुळेच आम्ही जिंकलो,” असे तस्कीनने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. “भारतात परिस्थिती आव्हानात्मक आहे. एसजी चेंडूंमुळे भारताला अधिक फायदा होत आहे. भारतीय क्रिकेटपटू लहानपणापासून एसजी बॉलने खेळतात. चेंडूंचा वापर आमच्यापेक्षा चांगला कसा करायचा हे भारताला माहित आहे,” असं तो म्हणाला. 

बांगलादेश संघाला SG चेंडूसह खेळण्याचा अनुभव नसल्याचं पहिल्या डावात दिसून आलं. सामना सुरु झाल्यानंतर ते चेंडू स्विंग करण्यात यशस्वी ठरत होते. हसन महमूदने 30 षटकांपूर्वी 4 बळी घेतले, परंतु चेंडू जसजसा जुना झाला तसतसा त्यांची आक्रमकता कमी झाली. ज्यामुळे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी दमदार भागिदारी केली. 

बांगलादेश त्यांच्या घरच्या कसोटीत कुकाबुरा बॉल वापरतो, तर भारत हा एकमेव देश आहे ज्याने एसजी बॉलची निवड केली आहे. भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने 308 धावांची आघाडी घेतली होती. भारताने बांगलादेशला 149 धावांत सर्वबाद केलं आहे. 

'आम्ही चांगली फलंदाजी करु शकलो असतो'

तस्कीन अहमदने यावेळी बांगलादेशची फलंदाजांनाही नवीन चेंडूने खेळताना कशाप्रकारे संघर्ष करावा लागला याबद्दल सांगितलं. “आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो असतो, जरी आम्ही सुरुवातीला संघर्ष केला. फलंदाजांनी त्यांच्या चुका मान्य केल्या. नवीन चेंडूने आम्ही चांगला खेळ केला असता तर इतक्या विकेट्स गमावल्या नसत्या. मधल्या फळीसाठी, नवीन चेंडूसह खेळणे कठीण होते,” असं तो म्हणाला.