आयसीसीनं शेअर केला पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ, मग मागितली माफी

 क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माफी मागावी लागली आहे. 

Updated: Apr 25, 2018, 06:01 PM IST
आयसीसीनं शेअर केला पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ, मग मागितली माफी  title=

मुंबई : क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माफी मागावी लागली आहे. आयसीसीच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट रिट्विट करण्यात आलं. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून क्रिकेटबद्दलची माहिती दिली जाते. पण क्रिकेटशी काहीही संबंध नसलेलं ट्विट आयसीसीकडून रिट्विट करण्यात आलं. २५ एप्रिलला जोधपूरच्या न्यायालयानं आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेनंतर आयसीसीनं आसाराम बापू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आलेला एक व्हिडिओ रिट्विट केला. हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीनं नारायण नारायण असं म्हणलं. या ट्विटवर टीका होऊ लागल्यावर आयसीसीला ही चूक लक्षात आली आणि त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. यूजर्सनी मात्र आयसीसीच्या या ट्विटचे स्क्रीन शॉट घेतले होते.

आयसीसीचा माफीनामा

या सगळ्या प्रकारानंतर आयसीसीनं माफी मागितली आहे. क्रिकेटशी संबंध नसलेलं ट्विट केल्यामुळे आयसीसी निराश आहे. यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर याबद्दल आम्ही माफी मागतो. याप्रकरणाच्या चौकशीला आम्ही सुरुवात केली आहे, असं ट्विट आयसीसीनं केलं.

हमसून हमसून रडला आसाराम

बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. जोधपूर कोर्टानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय... तर अन्य दोन दोषींना वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.  निकाल ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. दरम्यान, या  शिक्षेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे तसंच त्याच्या वकिलांनी म्हटलंय.

भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं ढोंग करणा-या या आसारामच्या चेह-यामागे दडलेला काळा चेहरा समोर आला आणि एकच खळबळ उडाली.  15 ऑगस्ट 2013 मध्ये आसारामनं एका अल्पवयीन मुलीवर आसारामनं बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली... आसारामवर धर्मगुरु बनून बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी,  बलात्कारासाठी अपहरण करणे, अश्लील चाळे करणे, धमकी देणे, महिलांचा स्वाभिमान दुखावणे या सगळ्या आरोपांप्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय. न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय.

ती तारीख होती 15 ऑगस्ट 2013... सगळा देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात रंगला होता... त्याचवेळी हा आसाराम जोधपूरमधल्या मणाई गावातल्या त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर करत होता. आसाराम मुलींना भूतप्रेताची भीती दाखवायचा. अशीच भीती दाखवत त्यानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले... या कामासाठी आसारामचे साथीदार शिल्पी आणि शरदही त्याला मदत करायचे... 

याच शिल्पीनं पीडित मुलीला भूतबाधा झाल्याचं तिच्या आई वडिलांना सांगितलं. या पीडित मुलीचे आई वडील आसारामला अक्षरशः देव मानायचे... ते तिला घेऊन मणाई आश्रमात आले... आसारामनं तिच्या आई वडिलांना रात्रभर आश्रमातल्या एका कुटीबाहेर थांबायला सांगितलं आणि रात्रभर मुलीवर बलात्कार राहिला... मुलीनं हा सगळा प्रकार आई वडिलांना सांगितल्यावर दिल्लीमध्ये 20 ऑगस्टला गुन्हा नोंदवण्यात आला... त्यानंतर 31 ऑगस्ट 2013 ला आसारामला इंदूरमधल्या आश्रमातून अटक करण्यात आली. आसारामवर खटला सुरू झाल्यानंतर 9 साक्षीदारांवर हल्ले झाले, त्यात तिघांचा मृत्यू झालाय.