टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्याची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून माघार... पत्नी नताशाचं कारण?

IND vs SL Hardik Pandya: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 16, 2024, 06:22 PM IST
टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्याची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून माघार... पत्नी नताशाचं कारण? title=

Hardik Pandya Out From IND vs SL Series: झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यासाठी (Team India Tour of Sri Lanka) सज्ज झालीय. श्रीलंका दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 27 जुलैपासून या दौऱ्यालासुरुवात होणार असून बीसीसीआय याच आठवड्यात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) स्पष्ट केलं आहे. हार्दिक पांड्याने यासाठी वैयक्तिक कारण दिलं आहे. पण हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशामधला (Natasa Stankovic) दुरावा याला कारणीभूत आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. 

हार्दिकची एकदिवसीय मालिकेतून माघार
भारत आणि श्रीलंकादरम्यानची एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. त्याआधी 27 जुलैपासून टी20 मालिका होईल. 27, 28 आणि 30 ऑगस्टला टी20 सामने खेळवले जाणार आहेत. हार्दिक पांड्या टी20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार असून त्यानंतर तो भारतात परतणार आहे. हार्दिक पांड्या श्रीलंका दौरा अर्धवट सोडण्यामागे नेमकं काय कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

पत्नी नताशाचं कारण
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं हार्दिक पांड्याने बीसीसीआयला कळवलं आहे. वास्तविक गेल्या काही काळापासून हार्दिक आणि नताशाच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नताशाने हार्दिकसाठी सोशल मीडियावर कौतुकाची एकही पोस्ट केली नव्हती. इतकंच काय तर हार्दिकला चिअर करण्यासाठी ती अमेरिका आणि वेस्ट इंडिजलाही नव्हती. नताशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिकचं आडनाव काढून टाकलं, त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच वेग आला. 4 मार्चला मुलगा अगस्त्य आणि हार्दिक पांड्याचा वाढिदवस होता. पण तिच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एकही पोस्ट शेअर करण्यात आली नव्हती. हार्दिक एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडण्यामागे हेच वैयक्तिक कारण आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

ऑक्टोबरमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना
हार्दिक पांड्या भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध खेळला होता. आता बऱ्याच काळानंतर हार्दिक श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण एकदिवसीय मालिकेतून त्याने स्वत:च माघार घेतली आहे. 

टी20 मालिकेत कर्णधार
श्रीलंका दौऱ्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत मात्र हार्दिक पांड्या खेळणार आहे. शिवाय त्याच्याकडे टी20 साठी टीम इंडियाचं कर्णधारपदही सोपवलं जाण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याशिवाय ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरचाही समावेश आहे.