ENG vs WI मालिकेत लागू होणार 'हा' कडक नियम, गोलंदाजांचं टेन्शन वाढलं

येत्या 13 डिसेंबरपासून इंग्लंड आणि वेस्टइंडिजदरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून आयसीसी क्रिकेट सामन्यात एक नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा गोलंदाजांना मोठा फटका बसणार आहे.  या मालिकेत चाचणी म्हणून आयसीसी हा नियम लागू करणार आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 11, 2023, 07:44 PM IST
ENG vs WI मालिकेत लागू होणार 'हा' कडक नियम,  गोलंदाजांचं टेन्शन वाढलं title=

ICC New Rules : इंग्लंड आणि वेस्टइंडिजदरम्यान (Eng vs WI) येत्या बुधवार म्हणजे 13 डिसेंबरपासून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होणार आहे. या मालिकेत आयसीसी एक नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा गोलंदाजांना सर्वात जास्त फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात षटकांची मर्यादा वेळेत पूर्ण न केल्यास त्या संघाला आर्थिक दंड ठोठावला जातो. इतकंच काय तर कर्णधाराच्या मॅच फिमधूनही पैसे कापले जातात. शिवाय शिक्षेलाही सामोरं जावं लागतं. यात संघाचं आणि खेळाडूचं मोठं नुकसान होतं. हा प्रकार टाळण्यासाठी आयसीसीने (ICC) नवा नियम बनला आहे. सध्या हा नियम केवळ चाचणी म्हणून लागू करण्यात येणार आहे. हा नियम यशस्वी झाल्यास क्रिकेट सामन्यात कायम स्वरुपी लागू केला जाणार आहे. 

काय आहे हा नियम?
वेळेत षटक पूर्ण होण्यासाठी आयसीसीने स्टॉप क्लाकचा नियम (Stop Clock Rule) बनवला आहे. हा नियम 13 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड-वेस्टइंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत लागू केला जाणार आहे. दोन षटकांमधला वेळ नियंत्रित करण्यासाठी स्टॉप क्लॉक नियम असणार आहे. या नियमानुसार षटकाचा पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजाला केवळ एक मिनिटाची वेळ देण्यात येणार आहे म्हणजे दोन षटकांदरम्यान केवळ एक मिनिटाचा अवधी असणार आहे. 

पेनल्टी लागणार 
आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार दोन षटकांमध्ये एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन वेळा इशारा दिला जाईल. पण एकाच सामन्यात तिसऱ्यांदा असा प्रकार झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांची पेनाल्टी लागेल. या नियमामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या मनात षटकं वेळत पूर्ण करण्याची भीती असेल. इंग्लंड-वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेत हा नियम यशस्वी झाल्यास क्रिकेट सामन्यात कायमस्वरुपी या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

फलंदाजांसठीही नियम
अशाच प्रकारचा नियम फलंदाजांसाठीही असणार आहे. विकेट गेल्यानंतर किंवा रिटायर्ड झाल्यानंतर पुढचा फलंदाज दोन मिनिटाच्या आत खेळपट्टीवर आला नाही तर तो फलंदाज बाद घोषित केला जाईल. या नियमाला टाईम आऊट म्हटलं जातं. भारतात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट पद्धतीने बाद देण्यात आलं होतं. बांगलादेशचा कर्णधार शाकिल अल हसनने अंपायरकडे दाद मागितली होती, आणि अंपायरने मॅथ्यूजला बाद घोषित केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधअये टाईम आऊट पद्धतीने बोद होण्याची ही पहिलीच घटना ठरली होती.