भिडले, नडले अन् अखेर सुवर्णपदक जिंकलं; भारतीय कबड्डीपट्टूंनी इराणला दाखवला इंगा

एशियन गेम्समध्ये तुफान राडा झाला आहे. भारत आणि इराणमध्ये झालेल्या कबड्डी सामन्यात खेळाडू आपापसात भिडले आहेत. यानंतर सामना तात्पुरता थांबवण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2023, 03:20 PM IST
भिडले, नडले अन् अखेर सुवर्णपदक जिंकलं; भारतीय कबड्डीपट्टूंनी इराणला दाखवला इंगा title=

एशियन गेम्समध्ये भारताने पुरुषांच्या कबड्डीतही सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताने 33-29 ने अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. दरम्यान या सामन्यात अंतिम क्षणी दोन्ही संघ आपापसात भिडल्याने परिस्थिती चिघळली होती. दोन्ही संघाचे खेळाडू आमने-सामने आल्याने वातावरण तापलं होतं. यानंतर अर्ध्या तासाहून अधिक वेळेसाठी सामना थांबवण्यात आला होता. यादरम्यान दोन्ही बाजूंच्या खेळाडूंची समजूतही काढण्याचे प्रयत्न झाले. पण अखेर नियनानुसार गुणांचं वाटप करण्यात आलं. यानंतर दोन्ही बाजूंनी रेड टाकण्यात आली आणि भारताने हा सामना जिंकला. भारतीय पुरुष कबड्डी संघाने 4 वर्षांनी सुवर्णपदक जिंकलं आहे.
 

नेमका काय वाद झाला?

भारत आणि इराणमध्ये झालेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात खेळाडू आपापसात भिडले. करो या मरो स्थिती असताना पवन सेहरावत याने रेड टाकली आणि वाद पेटला. भारताचा दावा होता की, कर्णधार पवन सेहरावत इराणच्या बचावपटूला हात न लावता लॉबीत गेला. इराणचे खेळाडूही त्याच्यासोबत लॉबीत गेले होते. त्यामुळे भारत 4 गुणांचा दावा करत होता. या कारणामुळे खेळ थांबला होता.

भारत आणि इराणमध्ये गुणांवरुन वाद झाल्यानंतर यामुळे सुमारे अर्धा तास खेळ थांबला होता. दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाल्यानंतर रेफ्री दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणीही ऐकण्यास तयार नाही. ऱेफ्रीने इराणच्या बाजूने निर्णय दिला असता भारतीय खेळाडू विरोध करत मॅटवरच खाली बसले. जेव्हा निर्णय बदलला तेव्हा इराणच्या खेळाडूंनी विरोध सुरु केला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यानंतर नियमानुसार भारताला 4 आणि इराणला 1 गुण देण्यात आला. यानंतर गुणसंख्या 32-29 होती. यानंतर दोन्ही बाजूंनी रेड टाकण्यात आली असता भारताने 33-29 ने अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

भारताची 104 पदकांची कमाई

भारताने एशियन गेम्समध्ये इतिहास रचला आहे. कबड्डी आणि क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकल्याने भारताची पदकसंख्या 104 वर पोहोचली आहे. आतापर्यंत भारताने 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 41 कांस्यपदक जिंकली आहेत.