आगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर

Ajit Agarkar On Hardik Pandya: गौतम गंभीरमुळे हार्दिक पंड्याची उचलबांगडी झाली असं म्हटलं जात असलं तरी आता वेगळीच माहिती समोर आलीय. हार्दिक पंड्याऐवजी अचानक सूर्यकुमार यादवची भारताच्या कर्णधारपदी वर्णी कशी लागली असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच आता यासंदर्भातील नवीन खुलासा समोर आला असून यामागील आगकरकर कनेक्शन चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 21, 2024, 11:49 AM IST
आगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर title=
अजित आगरकरमुळे पंड्याला डच्चू

Ajit Agarkar On Hardik Pandya: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने गुरुवारी श्रीलंकन दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवलं आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचा विचार करुन भारतीय संघाच्या निवड समितीने हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-20 फलंदाज असलेला सूर्यकुमार हा कर्णधारपदासाठी अगदीच अनपेक्षित निवड ठरला. टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माने टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर या स्पर्धेत उपकर्णधार राहिलेल्या हार्दिककडेच भारतीय संघाची सूत्रं जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तसं न घडता बीसीसीआयने हार्दिकला मोठा धक्का देत सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद देतानाच हार्दिककडून उपकर्णधारपदही काढून घेत ते शुभमन गिलकडे सोपवलं आहे.

फोन करुन कळवला निर्णय

हार्दिक पंड्याला डच्चू देण्याचा निर्णय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी परस्पर संमतीने घेतल्याचं समजतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचा उपकर्णधार असताना हार्दिकने उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र कर्णधारपदच काय उपकर्णधारपदही काढून घेत असल्याचं हार्दिकला निर्णय जाहीर करण्याआधी सांगण्यात आलं होतं. श्रीलंकन दौऱ्याचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल असं गौतम गंभीर आणि आगकर यांनी हार्दिकला फोनवरुन कळवल्याचं समजतं.

नक्की वाचा >> 'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय...'; 'त्या' आरडाओरडीवरुन शमीने हार्दिकला सुनावलं

आगरकरमुळे उचलबांगडी

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांपैकी सूर्यकुमारवर भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांनी अधिक विश्वास असल्याचं फिडबॅकमध्ये बीसीसीआयला कळवल्याचं समजतं. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये सूर्यकुमारने ज्या पद्धतीने संघाचं नेतृत्व केलं त्यामुळे त्याला अनेक खेळाडूंनी उघडपणे पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता पीटीआयच्या एका वृत्तानुसार, अजित आगरकरला हार्दिक पंड्यावर विश्वास नसल्याने त्याची उलचबांगडी झाली आहे. भारताचा हा अष्टपैलू खेळाडू प्रकृतीच्या हिशोबाने अंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषवण्यासाठी योग्य असल्यासंदर्भात आगरकरच्या मनात शंका होता. आगकरकला हार्दिक हा सक्षम कर्णधार वाटतं नसल्याचं त्याने बैठकीत उघडपणे सांगितल्याचं समजतं. 

नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'

आयपीएलमधील कामगिरीचं यश हार्दिकचं नाही असं निवड समितीचं मत

कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने 2022 आणि 2023 च्या आयपीएलच्या पर्वात गुजरात टायटन्सकडून खेळताना जी चमकदार कामगिरी केली त्यामध्ये प्रशिक्षक आशिष नेहराने केलेलं मार्गदर्शन फार महत्त्वाचं ठरलं. यावरुनच अनेकदा हार्दिकला हात धरुन योग्य मार्ग दाखवावा लागतो हे स्पष्ट झाल्याचं निवड समितीचं मत पडलं. मात्र मुंबई इंडियन्सचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर मुंबईच्या संघाचा दक्षिण आफ्रिकन प्रशिक्षक मार्क बाऊचरने आशिष नेहराप्रमाणे अगदी हात धरुन हार्दिकला मार्गदर्शन केलं नाही. त्यामुळेच हार्दिकला मुंबईचा कर्णधार असताना 2024 च्या आयपीएल पर्वात चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र मार्क बाऊचर या कालावधीमध्ये हार्दिकची हुर्यो उडवली जात असताना खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभा असल्याचं मात्र दिसून आलं. 

नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

दोघांचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड कसा?

रोहितच्या गैरहजेरीमध्ये हार्दिकने 16 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड उत्तम असून त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 7 टी-20 सामन्यांपैकी भारताने 5 सामने जिंकलेत हे विशेष. सूर्यकुमार टी-20 कर्णधार असला तरी एकदिवसीय क्रिकेट संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. यावरुनच यापुढे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी कायमच दोन वेगळ्या संघाचा विचार होईल हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न पहिल्याच दौऱ्यात करण्यात आला आहे.