Ganesh Visrjan 2024: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात? महाभारताशी आहे कनेक्शन

Ganesh Visrjan: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2024, 09:59 AM IST
Ganesh Visrjan 2024: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात? महाभारताशी आहे कनेक्शन title=
बाप्पाच्या मुर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात?

Ganesh Visrjan: दहा दिवस पाहुणा म्हणून राहिलेला बाप्पा आता आपल्या गावी जाणार आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. यावेळी घरी, सार्वजनिक मंडळात स्थापन गेलेल्या गणेशाच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. हे दृश्य गणेश भक्तांच्या डोळ्यात पाणी आणणारं असतं. जड अंतकरणाने गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. गणेशाची मुर्ती नदी, तलाव, समुद्रात विसर्जित करतात. जाता जाता श्रीगणेश सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. पाण्यात गणपती विसर्जन का करतात? याबद्दल जाणून घेऊया. 

पौराणिक कथांनुसार, श्रीवेद व्यास यांनी गणेश चतुर्थीपासून श्रीगणेशाला महाभारताची कथा सलग 10 दिवस ऐकवली होती. 10 दिवसांनंतर वेद व्यास यांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांना दिसले की, 10 दिवसांच्या मेहनतीने गणेशाचे तापमान खूप वाढले होते. यामुळे वेद व्यास यांनी श्रीगणेशाला तात्काळ जवळच्या तलावात जाऊन थंड पाण्याने स्नान करायला सांगितले.  त्यामुळे गणेशाची स्थापना करुन चतुर्थीला मूर्ती पाण्याने थंड केली जाते, असे म्हणतात. 

गणेश चतुर्थी आणि विसर्जनाचा महिमा 

भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. भगवान गणेशा स्थापना झाल्यानंतर चतुर्थीपर्यंत त्याची मनोभावे सेवा केली जाते. चतुर्थीला मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जन केल्यानंतर भगवान गणेश पुन्हा कैलास पर्वतावर जातात, असं म्हटलं जातं. विसर्जनाला खूप जास्त महत्व आहे. या दिवशी अनंत शुभ फल प्राप्ती केली जाऊ शकते. त्यामुळे या दिवसाला अनंत चतुर्थी असे म्हणतात. 

गणेश विसर्जनाला काय करावे?

अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोदक आणि त्या दिवशी तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. गणपतीची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवावी आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर धान्याच माप ठेवून ते आतल्या बाजूला रित करावं. मग पुढे विसर्जनासाठी जावं. बाप्पाला निरोप दिल्यानंतर ताटावर त्या ठिकाणाची माती किंवा वाळू घरी आणावी. ज्याठिकाणी बाप्पा बसवला असतो तिथे ठेवावी किंवा घरातील चार कोपऱ्यात ठेवावी. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती पौराणिक कथांवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)