चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बांगलादेशमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. इमर्जिंग चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. १५ ते २६ मार्चदरम्यान बांगलादेशमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

Updated: Feb 17, 2017, 03:06 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बांगलादेशमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने title=

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. इमर्जिंग चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. १५ ते २६ मार्चदरम्यान बांगलादेशमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

ही स्पर्धा यापूर्वी २०१३मध्ये खेळवण्यात आली होती. ही स्पर्धा एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेकडून भरवली जाते. या स्पर्धेसाठी संघातील चार खेळाडू हे २३वर्षापेक्षा अधिक वयाचे असतील. तर बाकी खेळाडू हे २३ वर्षापेक्षा कमी वयाचे असतील. तसेच या स्पर्धेतील सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील अशी स्पर्धेची रचना करण्यात आलीये. त्यानंतर बाद फेरीद्वारे अंतिम फेरीसाठी संघनिवड होईल. 

बीसीसीआयचे अधिकारी एमव्ही श्रीधर यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ इमर्जिंग चषक स्पर्धेत जरुर सहभागी होणार आहे. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील ही द्विपक्षीय मालिका नाहीये. ही स्पर्धा वेगळी आहे त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल. 

या स्पर्धेत भारत, पाकिस्तानयांच्याव्यतिरिक्त बांगलादेश, श्रीलंका,अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग आणि नेपाळ या संघाचा समावेश असणार आहे. 

या स्पर्धेदरम्यानच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका असल्याने २३ वर्षावरील ४ क्रिकेटपटू हे भारताच्या नियमित संघातून नसतील.