अखेर मुंबईत मेट्रो धावली, मुंबईकरांना एसीचा प्रवास!

मुंबईत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न आता मुंबईकरांना विचारा लागणार नाही. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो धावली. यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात मुंबईकरांना लवकच एसीचा प्रवास अनुभवता येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 9, 2013, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न आता मुंबईकरांना विचारा लागणार नाही. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो धावली. यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात मुंबईकरांना लवकच एसीचा प्रवास अनुभवता येणार आहे.
शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वर्सोवाहून मेट्रो निघाली आणि घाटकोपरपर्यंत पोहचली. ही यशस्वी चाचणी घेतल्यामुळे डिसेंबरपर्यंत वर्सोवा ते एअरपोर्टपर्यंत मेट्रो सुरु होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी मेट्रो चाचणीसाठी आवश्यक असणारं ईआय़जी सर्टिफिकेट मेट्रो वन प्रकल्पाला देण्यात आलं होतं.
या आधी वर्सोवा ते एअरपोर्ट रोडपर्यंतच मेट्रोची चाचणी सुरू होती. एअरपोर्ट ते घाटकोपरपर्यंतची वीज पुरवठा यंत्रणेची जोडणी पूर्ण झाली मात्र, वीज पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मेट्रो धावण्यास उशीर होत होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या ईआयजी विभागानं वीज पुरवठ्याची परवानगी दिल्याने आजची मेट्रोची चाचणी यशस्वी झाली.
दरम्यान, मेट्रो खरंच मुंबईत धावेल का, असा प्रश्न विचारण्यात येत होता. कारण सरकारच्या उदासीनतेमुळे मेट्रोच्या कामाला वेगच येत नाहीय. मेट्रोसाठी चीनहून आलेले आठ डब्बे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्येच अडकून पडलेत. मेट्रोच्या या डब्यांना कस्टममधून सूट मिळावी, यासाठी सरकारनं एक पत्र देणं आवश्यक आहे. पण शहर विकास विभागाला गेल्या आठ महिन्यांत हे पत्र द्यायला सवड मिळालेली नाही. त्यामुळे मेट्रोचे हे आठ डबे तसेच पडून होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.