EXCLUSIVE- सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू गझल आढळल्या

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेची बंधने झुगारुन उर्दू भाषेत देशभक्तीपर गजल लिहिल्या आहेत. १९२१ मध्ये लिहिलेल्या गजलांच्या हस्तलिखिताची प्रत इतक्या वर्षानंतर सापडली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 27, 2013, 05:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेची बंधने झुगारुन उर्दू भाषेत देशभक्तीपर गजल लिहिल्या आहेत. १९२१ मध्ये लिहिलेल्या गजलांच्या हस्तलिखिताची प्रत इतक्या वर्षानंतर सापडली आहे. सावरकरांच्या या गजलांच्या प्रत्येक शब्दातून देशप्रेम व्यक्त होते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नाव...त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आजही अनेकांना प्रेरणा देणारी आहे.. अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतांना सावरकरांनी जराही खचून न जाता लेखन सुरु ठेवलं..त्यावेळी त्यांनी उर्दू भाषेतून देशभक्तीपर साहित्य निर्माण केलं...सावरकरांचं हे दुर्मिळ साहित्य नुकतेच जगासमोर आलंय..
अभी मेराजका क्या जिक्र, यह पहिली ही मंझिल हैं
हजारों मंजिलों करनी हैं ते हमको कठन पहिले
सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली असली तरी ते खचून गेले नव्हते आणि तेच या ओळीतून दिसून येतंय..सावरकर म्हणतात.. अजून शिखराच्या गोष्टी का करता.. आता आम्ही काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलो, ही पहिली पायरी आहे. हजारो पाय-या अडथळे पार करण्याचे ठरवल्याशिवाय काही होणार नाही.
मुहिब्बाने वतन होंगे हजारों बेवतन पहिले
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले
सावरकरांच देशावर किती प्रेम होतं ते या मतल्यातून तुमच्या लक्षात येईल..
या देशावर प्रेम करणारे खूप होतील, पण आधी हजारोंना निर्वासित व्हावे लागेल. आपल्या भारताची भरभराट होईल. पण त्यासाठी प्रथम अंदमान भरावं लागेल. सावरकरांच्या या गझलेतून देशप्रेम आणि त्याग दिसून येतो. तुरुंगात असतानाही त्यांचा आशावाद जराही कमी झाला नाही.
खुशी के दौर दौरे से है यां रंजों मुहन पहिले
बहार आती हैं पीछे और खिजां गिरदे चमन पहिले

.....आनंदाचे क्षण नंतर आहेतच, पण प्रथम कष्ट, प्रयत्न हवेत. बागेभोवती आता पानगळ आहे. पण लक्षात ठेवा वसंत ऋतू मागोमाग येत आहे. पुढील ओळींमधून सावरकरांनी तरुणांना स्वातंत्र्यांच्या संग्रमात सामील होण्याचे आवाहन केलंय.

हमारा हिंद भी फूले फलेगा एक दिन लेकिन
मिलेंगे खाक में लाखों हमारे गुलबदन पहिले
.....भारताचीही एक दिवस भरभराट होईल. पण त्याआधी आमच्यासारखे लाखो सुकुमार धुळीत मिळायला हवेत.
उन्ही के सिर रहा सेहरा, उन्ही पे ताज कुर्बा हो
जिन्होंने फाडकर कपडे रखा सिरपर कफन पहिले
ज्यांनी देशासाठी कपडे फाडून डोक्यावर कफन बांधले आहे. जे मरणाला तयार आहेत.त्यांच्याच माथ्यावर सेहरा बांधला जाईल,त्यांच्याच माथ्यावर मुकूट ठेवला जाईल.. सावरकरांच्या ऊर्दू भाषेतील गजलांच्या हस्तलिखितांची प्रत सापडल्यानं त्यांच्यावर उर्दूविरोधक म्हणून केला जाणारा आरोप इतक्या वर्षानंतर पुसला जाणार आहे.

भाषेला धर्माच्या बंधणात अडकवू नये. या मताचे सावरकर होते. त्यामुळेच त्यांनी अंदमानच्या तुरुंगात असताना उर्दू भाषा केवळ शिकले नाही तर उर्दूत गजलाही केल्या. इंग्रजांना काय लिहिले ते कळू नये म्हणून सावरकरांनी कल्पकतेने वही सजवली होती. सुरुवातीच्या काही पानावर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, भगवान बुद्ध, कृष्ण, यशोदा यांची चित्रे चिकटवली आहेत. या सर्व गजला देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अशाच आहेत.
मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हैं
यही मजहब, यह फिर्का, यही हैं खानदाँ मेरा
......माझे रक्त हिंदुस्थानी आहे. माझी जात तीच आहे. मी संपूर्ण हिंदू आहे, हाच माझा पंथ, धर्म आणि हेच माझे खानदान आहे.

तेरी सेवामें ऐ भारत अगर सर जाये तो जाये
तो मैं समझू कि हैं मरना हयाते-जाविदाँ मेरा

हे भारतमाते तुझी सेवा करताना मृत्यू आला तर मला दुख तर होणार नाहीच पण उलट मला अमर झाल्याचा आनंद होईल. ११ वर्ष अंदमानात अपार हालअपेष्टा सहन करुन सावरकरांच्या विचारात जराही फरक पडला नाही..त्याचं ध्येय अढळ होतं हेच त्यांच्या या गझलातून पुन्हा एकदा समोर आलंय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.