मोदींना भाजप डावलू शकत नाही - ठाकरे

नरेंद्र मोदी यांना डावलून महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, हेच मुंबईतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले, असे सामनाच्या अग्रलेखाच्या सुरूवातीला म्हणून भाजपमधील अंतर्गत वादांवर, रुसव्याफुगव्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही टिप्पणी केली आहे.

Updated: May 26, 2012, 09:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नरेंद्र मोदी यांना डावलून महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, हेच मुंबईतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले, असे सामनाच्या अग्रलेखाच्या सुरूवातीला म्हणून  भाजपमधील अंतर्गत वादांवर, रुसव्याफुगव्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही टिप्पणी केली आहे.

 

मित्रवर्य भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामुळे दोन दिवस बर्‍याच राष्ट्रीय पुढार्‍यांची वर्दळ मुंबईत होती. या राष्ट्रीय बैठकीची फलनिष्पत्ती काय, तर खास घटनादुरुस्ती करून नितीन गडकरी यांची भाजप अध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाली. त्यासाठी नरेंद्र मोदी यांची संमती घ्यावी लागली व मोदी यांचा होकार मिळविण्यासाठी गडकरी यांना संजय जोशी यांची कुर्बानी द्यावी लागली.

 

संजय जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच गडकरी यांचेही खासमखास होते, पण मोदी यांचे वाकडे असल्याने जोशी यांना जावे लागले. भारतीय जनता पक्षात मोदी यांचा शब्द चालतो व त्यांच्या राग-लोभास महत्त्व आहे.नरेंद्र मोदी यांना डावलून महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत, हेच मुंबईतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले. भाजपमधील अंतर्गत वादांवर, रुसव्याफुगव्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही टिप्पणी केली आहे. येडियुरप्पा हे भाजपमधील मानवी बॉम्ब आहेत, दुसऱ्यांदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेल्या नितीन गडकरींना अशा अनेक मानवी बॉम्बच्या वाती ओल्या करुन पुढे जायचं आहे, अशा टिपिकल ‘ठाकरी’ स्टाईलमध्ये त्यांनी भाजपमधील वादांवर टिप्पणी केली.

 

‘संजय जोशी हटाव’चा मुद्दा मोदी यांनी प्रतिष्ठेचा केला होता. याच कारणाने गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला होता व मुंबईतील बैठकीतही ते सहभागी होतील की नाही याविषयी शंकाच होती. राष्ट्रीय कार्यकारिणीस आपण हजेरी लावावी असे वाटत असेल तर संजय जोशी यांना ‘बाहेर काढा’ ही मोदी यांची अट अखेर मान्य करावी लागली.

 

नरेंद्र मोदींचे वजन असल्याने अखेर मोदी मुंबईत उतरत असताना संजय जोशी गेले.  मोदींना बगळून भाजपमध्ये कोणताही निर्णय घेता येणार नाही, हे स्पष्ट झालं असल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. संजय जोशींना द्यावी लागलेली ‘कुर्बानी’ हे त्याचंच उदाहरण असल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे.