नाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती

महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2017, 06:40 PM IST
नाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती title=

नाशिक : महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे. 

नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा रविवार कारंजा परिसर राजकीय गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला. महापालिकेच्या प्रभाग १३ मध्ये मोडणाऱ्या या परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार,  मनसेच्या  विद्यमान नगरसेविका सुरेखा भोसले, आणि काँग्रेसचे नगरसेवक वत्सला खैरे आणि शाहू खैरे यांनी पक्षीय भिंती मोडून पॅनलची निर्मिती केली आहे.

मनसेनं शहरात केलेल्या राजकीय खिचडीची सर्वत्र  चर्चा सर्वत्र सुरु आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ पाच मध्येही मनसेच्या दोन  उमेदवारांचं इंजिन दोघा अपक्ष उमेदवारांच्या शिट्टी आणि गॅस सिलिंडरबरोबर धावतेय. तर महापौरांसमोरही काँग्रेस राष्ट्रवादीचे आव्हान उरलेले नाही. 

राजाला साथ द्या असे गाणे गात मनसेने भावनिक साद घातली आहे. कारण मनसेच्या नाशिकच्या गडावरचे २६- २७ शिलेदार त्यांच्या राजाला सोडून निघून गेलेत. महापालिकेच्या १२२ जागाही मनसे लढवू शकत नाहीये. मनसे या महाआघाडीला खिचडी मानत नाही, काँग्रेसला ही अपरिहार्यता आहे असं वाटतंय. तर अपक्ष गुरमीत बग्गा लोकांची अपेक्षा पूर्ण करत असल्याचे सांगतात. 

लोकसभा निवडणुकीत  मनसेनं “एकाची भीती म्हणून केली महायुती” असा प्रचार राज्यभर करून शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली होती. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज ठाकरे वारंवार वाभाडे काढायचे. त्यांच्याशीच आज मनसेला महाआघाडी करण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.