पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी

जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी गेला आहे. जिल्ह्यातल्या जव्हारमधील कुपोषित बालकाचा नाशिकमध्ये पहाटे दुर्दैवी अंत झाला आहे.

Updated: Sep 21, 2016, 08:43 PM IST
पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी title=

पालघर : जिल्ह्यात कुपोषणाचा चौथा बळी गेला आहे. जिल्ह्यातल्या जव्हारमधील कुपोषित बालकाचा नाशिकमध्ये पहाटे दुर्दैवी अंत झाला आहे.

बोगदरी ग्रामपंचायत मधील रुईघर येथील राहुल काशिराम वाडकर या दोन वर्षे वयाच्या बालकाला 19 तारखेला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. काल त्याला जव्हार येथून नाशिकला उपचारासाठी दाखल करणे गरजेचे होते. मात्र या बालकाचे पालक नाशिक येथे उपचारार्थ जायला तयार नव्हते. 

या बालकाबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी तात्काळ जव्हार कुटीर रुग्णालय गाठले आणि त्या बालकाच्या पालकांना नाशिकला नेण्यासासाठी प्रवृत्त केले. मात्र बालकाची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्याचा नाशिकमध्ये दुर्दैवी अंत झाला. अजून किती बालकांचा बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार असा संतप्त सवाल विवेक पंडित यांनी केला आहे. 

दरम्यान, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पालघर जिल्ह्याच्या दौ-यादरम्यानच ही घटना घडलीय.