कोल्हापुरात हद्दवाढीविरोधात बंद, विधिमंडळातही गाजला मुद्दा

हद्दवाढीचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. एकीकडे हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावात कडकडीत बंद पाळला जातोय.

Updated: Jul 27, 2016, 01:58 PM IST

कोल्हापूर : हद्दवाढीचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. एकीकडे हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावात कडकडीत बंद पाळला जातोय.

अनेक गावांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय.  उसगावात ग्रामस्थांनी शहराकडे येणारा रस्ता काही काळ अडवला. आता वाहतूक सुरळीत झालीय. पण काही वेळासाठी वाहतूकीची कोंडी झाली. तर दुसरीकडे कोल्हापुरातल्या आमदारांनी या हद्दवाढीविरोधात विधानभवनात आंदोलन केलं.

गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहर हद्दवाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हद्दवाढीची अधिसूचना निघेल अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हद्दवाढीबाबत अधिसूचना काढू नये अशी विनंती केली. तेव्हा लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना दिलंय.

हद्दवाढीच्या प्रक्रियेला १८ गावांचा विरोध आहे. त्यामुळे प्रस्तावीत १८ गावे आणि २ औद्योगिक वसाहतीमध्ये कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे.