हमारी अधुरी कहाणी : प्रेम आणि नात्याची अपूर्णता!

Updated: Jun 12, 2015, 09:20 PM IST
हमारी अधुरी कहाणी : प्रेम आणि नात्याची अपूर्णता! title=

 

चित्रपट : हमारी अधुरी कहानी
मुख्य भूमिका : विद्या बालन, इमरान हाश्मी, राजकुमार राव 
दिग्दर्शक : मोहित सूरी 
निर्माता : महेश भट्ट
वेळ : १२९ मिनिट 

मोहित सुरी आणि महेश भट्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडून एका अप्रतिम कलाकृतीची अपेक्षा करता येऊ शकते. 'हमारी अधुरी कहानी' त्या परिघात येता येता थोडक्यात बाहेर गेली. पण तरीही या चित्रपटात पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तिनही मुख्य कलाकारांचा अप्रतिम अभिनय, चांगले फिल्मी संवाद आणि प्रेमाचे केलेले चित्रण यासाठी हा चित्रपट पाहण्यास हरकत नाही. 

चित्रपटात नेहमीप्रमाणेच स्त्रिच्या स्वातंत्र्यावरही भाष्य केलं गेलंय. त्यामुळे पुरूष प्रेक्षकांना वसुधाचं वागणं, बोलणं खटकू शकतं. परंतु पतीरूपी पुरुषाने स्त्रिला आजही परंपरा आणि मर्यादांच्या जोखडामध्ये जखडून ठेवलंय. 

या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे या चित्रपटातील संवाद... महेश भट्ट आणि शगुफ्ता रफीक यांनी या चित्रपटाचं संवाद लेखन केलंय.

या चित्रपटाचं कथानक वसुधाभोवती (विद्या बालन) फिरत रहातं. वसुधा एका अपू्र्ण भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करते. लग्नाच्या बंधनात अडकल्यानं घरात आणि घराबाहेरही तिची घुसमट होतेय. ती एक काम करणारी स्त्री आहे, जी पतीच्या गैरहजेरीतही आपल्या मुलाचे उत्तम संगोपन करतेय. आरवच्या (इम्रान हाश्मी) संपर्कात आल्यावर तिला आपल्यातील अपू्र्णता जाणवू लागते. आरव तिच्या आयुष्यातील ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो.

चित्रपटात 'हवस' आणि 'वासना' यांसारख्या शब्दांचा वापर करण्यात आलाय पण आरव आणि वसुधाच्या अपू्र्ण आयुष्यातील प्रेमाचं प्रतिक आहे. 'हमारी अधुरी कहानी' स्त्री-पुरूष संबधातील अनेक पदर स्पर्शून जाते. 

हरी-वसुधा, आरव-वसुधा, आरवची आई, तिचा प्रियकर, हरीचे आई-वडील या सगळ्यांना कथानक हळूवार स्पर्शून जातं आणि त्यांच्या जीवनातील प्रेमाची अपू्र्णता खूप सुंदर आणि तेवढंच वाईट रूपात दिसून येते. 

आरव आणि वसुधाच्या जीवनातील प्रसंग आपल्याला भावनिक करतात परंतु चित्रपटात घटनांची कमतरता आहे. परंतु इतकं असूनही स्त्री पुरूष संबधातील बारकावे आपल्याला खिळवून ठेवतात. 

लेखकांची पारंपरिक विचारसरणी आणि शब्दांवर अधिक जोर दिल्यामुळे चित्रपटाचा भाव काहिसा कमी होतो. इमरान हाश्मीने आरवची आणि वसुधाची भूमिका विद्या बालनने फार सुंदररीतीनं निभावलीय. त्यात या चित्रपटात नात्यातील अपू्र्णता राखण्यात आलेलं यश प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. नात्यातील ही अपू्र्णता अनुभवायची असेल तर हा चित्रपट पाहाच... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.