भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा बंद केला आहे.

PTI | Updated: Sep 29, 2016, 08:18 PM IST
भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द title=

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आधी पाकिस्तानातील इस्लामाबादमधील सार्क परिषदेत बहिष्कार घातला. त्यानंतर अन्य तीन देशांनी माघार घेतली. त्यानंत LOC पार करत हल्ला चढवला. आता आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा रद्द केला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं घुसून केलेल्या लष्करी कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. वाघा बॉर्डरवर दररोज होणारे बिटिंग द रिट्रिटही सीमा सुरक्षा दलाने आज रद्द केली आहे. वाघा बॉर्डरवर दररोज हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमणात पर्यटकांची गर्दी असते. मात्र दोन्ही देशांतील तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता हा सोहळाच रद्द करण्यात आलाय. त्यामुळे बिटिंग द रिट्रिटचा हा सोहळा आज पार पडणार नाही.  

काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या. यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे पाच तळ उधळून लावले. त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकाना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं. या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे सहा वाजता ऑपरेशन यशस्वी केलं.  

विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार

भारताने पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशच्या नियमांअंतर्गत भारताने 1996मध्ये पाकिस्तान मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा दिला. 2012पर्यंत पाकिस्तानही भारताला हाच दर्जा देणं अपेक्षित होते. मात्र, हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

दहशतवादी तळांवर हल्ला चढवला

भारतीय सैन्याने आज पाकिस्तानात घूसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, भारताने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइक म्हणण्यास तयार नाही. दरम्यान, पाकिस्तानने आमचे केवळ दोन जवान मारले असल्याचे म्हटले आहे. तर 9 जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबत माहिती दिली.

Terror alert - Two suicide bombers planning to attack Wagah border: Pakistan warns India

पाकिस्तानची उलटीबोंब  

भारताच्या सर्जिकल स्ट्राइक कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी LOC क्रॉस केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्यांना तसेच उत्तर देण्यात येईल, अशी उलटीबोंब मारली आहे.

शरीफ यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाकिस्तान शांततेसाठी रक्त सांडत आहे. पाकिस्तानचा संयम अजून कायम आहे. भारतीय काश्मीर क्षेत्रात मानवाधिकारचे उल्लंघन होत, असल्याचे बोंब मारली आहे.