कर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2012, 07:02 PM IST

www.24taas.com,बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि राज्यभरात उमटले.
कर्नाटक सरकारनं बेळगावातल्या विधानभवनाचं उद्घाटन करत दडपशाहीची परंपरा कार्यक्रम ठेवली. या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची महाराष्ट्राची विनंती न जुमानता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं. या कर्नाटकी दडपशाहीविरोधात बेळगावातल्या मराठी भाषकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्यात.
बेळगावमध्ये विधान भवनाच्या उदघाटनाटनावरून उफाळून आलेल्या वादाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. कर्नाटक सरकारनं अरेरावी करत माध्यमांच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यापासून रोखलं. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.

कर्नाटकच्या दडपशाहीविरुद्ध शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्र बंद पुकारला. बंदला कोल्हापूर आणि सांगलीत चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता.
मुंबईत महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं. दादरमध्ये प्रबोधन ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पुतळ्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. राष्ट्रुपतींनी बेळगावमधल्या विधान भवनाच्या उदघाटनाला जाऊन मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप त्यांनी केलाय.
कर्नाटकच्या दडपशाहीची आणि महाराष्ट्रानं निषेध करण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली. मात्र वर्षानुवर्ष चिघळणा-या सीमाप्रश्नाला केवळ कानडी दडपशाही जबाबदार आहे की मराठी निष्क्रियतादेखील तितकीच कारणीभूत आहे, असल्याचे एक मत पुढे येत आहे.