हर्षवर्धन राजीनामा देऊ नका, अजितदादांनी घातली गळ

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनामा नाट्यानं आणखी एक वळण घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन जाधवांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय

Updated: Jan 10, 2013, 01:28 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनामा नाट्यानं आणखी एक वळण घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन जाधवांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याशी फोनवरून चर्चा करून राजीनामा न देण्याचा आग्रह अजित पवारांनी जाधवांना केला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं जाधवांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही जाधवांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकरलेला नाही. हर्षवर्धन जाधव यांनी मात्र कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय. अजितदादांनीच थेट संपर्क साधल्यामुळं हर्षवर्धन जाधव त्यांचा शब्द मानणान का याकडे सर्वांत लक्ष लागलंय.
तसंच राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करून मनसेला नेमका काय संदेश दिला याबाबतही चर्चा सुरू झालीय. मात्र यामुळं राजीनामा नाट्याचे सूत्रधार कोण ? आणि राजीनाम्याचे नेमकं गौडबंगाल काय असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर दुसरीकडं दुष्काळग्रस्त कन्नड तालुक्याला याचं काही सोयरसुतक आहे काय असा सवाल निर्माण झालाय.