आज विलासरावांवर अंत्यसंस्कार

केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचं पार्थिव चेन्नईहून लातुरात आणण्यात आलय. आज दुपारी चार वाजता बाभळगावात शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांचं चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झालं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 15, 2012, 09:07 AM IST

www.24taas.com, लातूर
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचं पार्थिव चेन्नईहून लातुरात आणण्यात आलय. आज दुपारी चार वाजता बाभळगावात शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांचं चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानं सा-या देशावर शोककळा पसरलीय. दुपारी 3 वाजेपर्यंत विलासरावांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणारय.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे काल दुपारी १.२४ मिनिटांनी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते.
विलासरावांच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाले होते. त्यातच त्यांना लिव्हरमध्ये कॅन्सर (हॅपेटोसेल्युलर कार्सिनोमा) झाला होता. त्यामुळे त्यांना ग्लोबल रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा होत नाही तोवर त्यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे स्पष्ट केले होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृतीत सुधारणा झाली होती. ते उपचारांना प्रतिसादही देत होते. मध्येच त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता. काल त्यांचे निधन झाले.