अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

Updated: Apr 26, 2012, 09:20 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची  गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

 

देशभरात उत्पादित झालेला गहू तांदूळ मनमाडमधील एफसीआयच्या गोडाऊनमध्ये  साठविला जातो.या गोदामाची साठवणूक क्षमता पाच लाख ८४ हजार मेट्रिक टन आहे. इथे ब्रिटीश काळातील ३२ गोदाम आणि शासनाने नाविन ११८ गोदाम बांधून गहू साठविण्यास सुरुवात केली. यात ३२ जमिनीखाली सायलो बांधण्यात आले या सायलोमध्ये एकदा गहू ठेवला तर तो आठ ते दहा वर्ष  या गोदामात टिकू शकतो मात्र हे सायलो बंद करण्यात आले आहेत. गहू त्यात साठवण्याऐवजी रेल्वे प्लॅटफॉर्मवर तर काही गोदामातील रस्त्यावर ठेवण्यात येतो आहे.काहींना प्लास्टिकची आवरणे नसल्याने अवकाळी पावसात धान्याची नासाडी होत आहे.

 

साठवणुकीसाठी उत्तम असलेल्या सिलो बँग आणि सायलोचा न होणारा वापर, नवीन कर्मचाऱ्यांची भरती नसल्याने तसच परिसरात स्वच्छता नसल्याने धान्यच पीठ होण्याची प्रक्रिया अधिक आहे. देशात याच पद्धतीने २००८-९ मध्ये २१ हजार ,२००९-११ १३ हजार टन तर तर यावर्षी सुमारे तीन हजार टन धान्य वाया गेल्याचा अहवाल खुद्द शासनाने लोकसभेत सदर केला आहे. यात एक हजार साडेतीनशे टन धान्य एकट्या महाराष्ट्रातील  गोदामात सडले आहे. धान्य सडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने लोकांना वाटण्यात यावे असा आदेश केलेला असताना सडत असलेल्या धान्य साठवणुकीचा आट्टाहास कशासाठी असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत गव्हाची उत्पाद्कता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येतो आहे. तर दुसरीकडे उप्लाब्ध असलेले धान्य सडत असल्याने केंद्र सरकारचा विभागांमधील समन्वय नसल्याचं उघड होत आहे.