मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली आहे. 

Updated: Apr 26, 2018, 10:04 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली आहे. राज्यपालांकडे चार जणांची अंतिम यादी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.  यात मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रमोद येवले, मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेचे संचालक अनिल कर्णिक, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही एस सपकाळ या चौघांची अंतिम यादीत निवड करण्यात आली आहे. या चौघांमध्ये खरी चूरस सुहास पेडणेकर आणि प्रमोद येवले यांच्या असल्याचं बोललं जातंय. 

विद्यापीठ प्रशासनाचा अनुभव नसला तरी दोनदा प्राचार्यपद भूषवल्यामुळे सुहास पेडणेकरांना विद्यार्थ्यांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर येवले यांनी नागपूर विद्यापीठात यशस्वीपणे परीक्षा पद्धत राबवून लवकरात लवकर निकाल लावण्यात यश मिळवलंय. त्यामुळे परीक्षा आणि निकालांच्या गोंधळामुळे घडी विस्कटलेल्या मुंबई विद्यापीठाला ते शिस्त आणू शकतात त्यामुळे त्यांचेही नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा आहे.