Election Result 2019 : आम्हाला जनतेचा कौल मान्य : अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.  

Updated: May 23, 2019, 07:43 PM IST
Election Result 2019 : आम्हाला जनतेचा कौल मान्य : अशोक चव्हाण title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालांवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेसला यश मिळू शकले नाही, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवणाऱ्या लाखो मतदारांचे आपण आभारी आहोत, असे ते म्हणालेत.

लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो आणि या निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आणि सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. नवे सरकार मतदारांच्या अपेक्षेवर खरे उतरेल, अशी आशा ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

या पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करू आणि सत्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी लढा यापुढेही कायम ठेवू, असे सांगून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते यामध्ये सहकार्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नांदेडच्या निकालाबाबत ते म्हणाले, येथील जनतेने चव्हाण कुटुंबियांवर कायमच प्रेम केले आहे. अनेक निवडणुकींमध्ये नांदेडकरांनी आमच्यावर विश्वास दाखवून सेवेची संधी दिली. यावेळी कदाचित त्यांना बदल हवा होता. त्यामुळे नांदेडच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. 

या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करून जातीयवादी पक्षांना मदतच केली. त्यामुळे अनेक मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागले, अशीही भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल ते म्हणालेत.