'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..'

Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 01:58 PM IST
'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..' title=
उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मागील दोन दिवसांपासून भाजपाला कानपिचक्या दिल्या जात आहेत. असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या विधानांवरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरसंदर्भात केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाहांना टोला लगावला आहे.

'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुन टोला

संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून संघाने केलेल्या टीकेसंदर्भात मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "मी बातमी थोडक्यात वाचली. 'ऑर्गनायझर'ने खडेबोल सुनावले आहेत. देशातील मतदारांनीही भाजपाला खडे चारले आहेत. आता असे खडे चारल्यानंतर तरी भाजपा सुधरणार आहे की नाही? की अजूनही ते आपल्या प्रतिपक्षांना संपवण्याच्या मागे लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही? की देशातील जनतेचे प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत मांडणाऱ्या त्यांना ते संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार कुचकामी आहे," असा टोला लगावला.

मला सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या सरकारचं भवितव्य काय वाटतं?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "सरकराच्या भवितव्याचं मला काही देणंघेणं नाही. मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे. मी शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी बोलायचं ते बोलेन. जे 400 पार होणार होते ते 240 वर अडकले. मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं," असं म्हटलं. 

नक्की वाचा >> बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

मणिपूरवरुनही लगावला टोला

मोहन भागवत यांनी मणिपूरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे असा संदर्भ देत प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "वर्षभरानंतर भागवत बोलले हे सुद्धा कमी नाही. वर्षभरानंतर मणिपूर जळतंय याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या हे काही कमी नाही. त्यांची एक एक वर्ष राबणारी ही जी काही संदेशवाहन यंत्रणा असेल ती सुधारली पाहिजे. ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार का? निवडणुकीच्या शेवटी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही. आम्ही भाजपा म्हणून समर्थ आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो पाया मानला जातो त्याची गरज संपलेली आहे. मोहन भागवतांसारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री-गृहमंत्री मणिपूरला जाणार की नाही?" असा सवाल उपस्थित केला. 

काश्मीरवरुन जे ढोल वाजवले...

तसेच उद्धव ठाकरेंनी, "काश्मीर पुन्हा पेटलं आहे. त्याबाबतीत 370 कलम काढल्याचे ढोल वाजवले. ते काढलं नाही स्थगित केलं आहे त्याबद्दल वकील सांगतील. सारखे समारंभ सुरु आहेत. आधी मोदींनी शपथ घेतली आज चंद्रबाबूंनी घेतली. त्यामध्ये तिथे लोकांचे जीव जात आहेत. आपल्या सुरक्षारक्षकांवर हल्ले झाले. आता तरी तुम्ही लक्ष देणार की नाही? की तुमचे रेकॉर्ड मांडत बसणार?" असंही म्हटलं.