संपूर्ण राज्यात उद्यापासून कलम 144 लागू - मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

शैलेश मुसळे | Updated: Mar 22, 2020, 04:06 PM IST
संपूर्ण राज्यात उद्यापासून कलम 144 लागू - मुख्यमंत्र्यांची घोषणा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज मध्यरात्रीपासूनच राज्यात कलम 144 लागू होणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. महत्त्वाचं काम नसेल तर 9 वाजल्यानंतर ही बाहेर पडू नका असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असून सर्वधर्माचे प्रार्थनास्थळ बंद राहणार आहेत. या शिवाय एसटी, खासजी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची सेवा फक्त सुरु राहणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

जे लोकं परदेशातून आले आहेत त्यांनी समाजात मिसळू नका असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आता आपण अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. जी जिद्द आज आपण दाखविली, ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद करीत आहोत.

इतर महत्त्वाचे मुद्दे

- जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 

- अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

- बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील 

- शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  

- आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. 

- ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशा लोकांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.

- चाचणी केंद्रे आपण वाढवत आहोत. ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.

- सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद राहिल.

- अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे.

- पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.