संजय राऊत यांच्या फेसबूक पोस्टचा अर्थ काय? अजूनही नाराज असल्याची चर्चा

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजय राऊत अजूनही नाराज आहेत का?

Updated: Jan 1, 2020, 03:30 PM IST
संजय राऊत यांच्या फेसबूक पोस्टचा अर्थ काय? अजूनही नाराज असल्याची चर्चा title=

मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजय राऊत अजूनही नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. संजय राऊत यांचा भाऊ सुनिल राऊत यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती, पण संजय राऊत यांनी हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर आता ही फेसबूक पोस्ट लिहून राऊत यांनी वेगळेच संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे का? असं बोललं जातंय.

'हमेश ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण..' अशी फेसबूक पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.

३० डिसेंबरला महाविकासआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या कार्यक्रमालाही संजय राऊत उपस्थित नव्हते. तेव्हाही संजय राऊत नाराज असल्याचं बोललं गेलं होतं. पण शासकीय कार्यक्रमात जाण्याचं मी टाळतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर नाराज झालो असतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेमध्ये काही जणं काल दाखल झाले, त्यांना आश्वासन दिले असेल, म्हणून त्यांना मंत्रीपद मिळालं असेल. सरकार स्थापन करताना अशी आश्वासनं पूर्ण करायची असतात, असं संजय राऊत म्हणाले होते.

'लोकं मंत्रिपदाच्या अपेक्षा ठेवू शकतात, पण आम्ही अशा अपेक्षा ठेवत नाही. पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पक्षासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे आणि हे आमचं बाळासाहेबांना वचन आहे. कायम पक्षाबरोबर राहू आणि पक्षवाढीसाठी योगदान देऊ', असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.