पंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना

देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? 

Updated: Jun 26, 2020, 08:46 AM IST
पंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना title=

मुंबई: बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सैन्य दलातील जात आणि प्रांताचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शरद पवार हे समाजातील लहान समूहांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी नुकताच केला होता. पण भाजपचे याच राजकारणापोटी पडळकर यांना आमदार केले. या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही तरबेज झाले.

लडाखमधील गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मग देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले. पण बिहारमध्ये निवडणुका असल्याने सैन्यदलातील जात, प्रांत यास महत्त्व आणले जात आहे. हे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे, असा इशारा 'सामना'तील अग्रलेखातून देण्यात आला आहे. 

चीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना

मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना भाजपवाले देशद्रोही ठरवतात. मात्र, शरद पवार यांच्यावर तशीच टीका झाली तर भाजपवाले हात झटकून मोकळे होतात. मध्यंतरी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनीही सीमेवरील सैनिकांच्या पत्नीबाबत खालच्या पातळीवरील विधान केले होते. एकप्रकारे ती सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची मानखंडनाच होती. त्या आमदाराला भाजपने आधी झटकले आणि नंतर पुन्हा जवळ केले. गोपीचंद पडळकर यांच्याबाबतीतही भाजप हेच करेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

'राऊतांची छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे, शरद पवार दोघेही दिसतील'

भाजपचे हे जाती आणि प्रांतीय राजकारण भयंकर गजकर्ण आहे. महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली आहे. हे कधी सुधारणार तेच कळत नाही, असेही 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.