राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा

'राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

Updated: Dec 28, 2021, 06:27 PM IST
राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा title=

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government)  होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असं काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती पण शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविलं. 

कायद्याचा पेच निर्माण होऊ नये म्हणून मविआ सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणं टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे. पण विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. मविआ सरकार अशा धमक्यांना घाबरत नाही. भारतीय जनता पक्षाने राज्यपालांच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणला. 

कोरोनामुळे आतापर्यंत झालेली अधिवेशने कमी कालावधीची झाली होती त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक घेता आली नाही. यावेळी ती प्रक्रिया पूर्ण करता आली असती पण त्यात भाजपानेच अडथळा आणला. भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे. सरकारकडे 174 चे बहुमत आहे त्यामुळे आवाजी मतदानावरून विरोधकांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असंही पटोले म्हणाले.