जनता कर्फ्युच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवेचा वेग मंदावणार; एक्स्प्रेस गाड्याही रद्द

शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतून एकही एक्स्प्रेस गाडी सुटणार नाही. 

Updated: Mar 20, 2020, 11:55 PM IST
जनता कर्फ्युच्या दिवशी मुंबईतील लोकल सेवेचा वेग मंदावणार; एक्स्प्रेस गाड्याही रद्द title=

मुंबई: येत्या २२ मार्चला पाळण्यात येणाऱ्या जनता कर्फ्युच्या दिवशी देशभरातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन  सुटणार नाही.  तसेच अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ मध्यरात्रीपूर्वी  सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना निर्धारित स्थानकापर्यंत पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच २० आणि २१ मार्चला पुणे आणि मुंबईतून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मात्र, या काळात मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सुरु राहणार आहे. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे ८० टक्के गाड्या सोडण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी जवळपास ९० रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून बंद ठेवण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांना देण्यात येत आहे, तसेच त्यांचे तिकीटाचे पैसेही परत करण्यात येणार आहेत.

एकीकडे सरकारने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना पुणे आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी दिसून आली. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावर आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, येत्या काही दिवसांत नागरिकांची गर्दी कमी न झाल्यास मुंबईतील लोकलसेवा नाईलाजाने बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा (COVID 19) सामना करण्यासाठी येत्या २२ मार्चला देशातील नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना केले होते. जनता कर्फ्यु लागू झाल्यानंतर नागरिकांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरातून बाहेर पडू नये.  हा कर्फ्यु म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लादून घेण्यात आलेला कर्फ्यु असेल. हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.